मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..


ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल जाहीर होणार


कोरोनामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या  राज्यातील विविध 15 जिल्ह्यांमधील 62 तालुक्यातील  238 ग्रामपंचायतींच्या निवडणुकींसाठी काल मतदान पार पडले. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत 78 टक्के मतदान पार पडले. ग्रामपंचायतीचा  निकाल आज जाहीर होणार आहे. 


वर्षा राऊतांना ईडीचं समन्स  


शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ) यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED)  समन्स बजावलं आहे.  पत्राचाळ प्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स बजावले आहे. वर्षा राऊत यांना चौकशीसाठी आज सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 


आरे प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी 


आरे प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आरे कारशेडचं सुरु झालेलं बांधकाम थांबवण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलीय. पर्यावरणप्रेमींकडून विविध सात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर आज एकत्रितपणे सुनावणी होण्याची शक्यता आहे.


पुढील चार दिवस महाराष्ट्रात पावसाचा अंदाज 


पुढील चार दिवस महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.  मुंबईत 7 आणि  8 ऑगस्टला  यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसचे आज आंदोलन


 महागाई आणि जीएसटीच्या  मुद्यांवरून  कॉंग्रेसकडून आज  देशभरात महागाईविरोधात आंदोलन केलं जाणार आहे. राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढणार आहे.  याशिवाय पंतप्रधान भवनाला देखील घेराव घालण्याची काँग्रेसची योजना आहे.


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेणार


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या शुक्रवारपासून चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून त्या आज  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधानांच्या सोबत होणाऱ्या बैठकीत ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालसंबंधीत जीएसटी आणि विविध विषयांवर चर्चा करणार असल्याची माहिती आहे. त्यांच्या या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला तीन वर्षे पूर्ण


जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला शुक्रवारी तीन वर्षे पूर्ण होत आहेत.   जम्मू आणि काश्मीरमधून 5 ऑगस्ट 2019 साली कलम 370 हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यानंतर जम्मू आणि काश्मीर खोऱ्यातील सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं. जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाचा आधार असलेले कलम 370 रद्द करण्याचे ऐतिहासिक विधेयक लोकसभेत 351 विरुद्ध 72 मतांनी विधेयक मंजूर करण्यात आलं होतं. यावेळी जम्मू काश्मीर राज्याचे दोन भाग करण्याचे विधेयक मांडण्यात आलं होतं. त्यानुसार जम्मू काश्मीर आणि लडाख अशी दोन राज्य बनवण्यात आली. दोन्ही राज्य केंद्रशासित घोषित करण्यात आली.