LIVE UPDATES | कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात 2 जुलै ते 12 जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर

केंद्र सरकारने एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. अनलॉक 2 अंतर्गत मोदी सरकारने अनेक निर्बंध शिथील केले असून अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. 30 जून रोजी लॉकडाऊन संपत आहे. अनलॉकचा पहिला टप्पा सध्या सुरू आहे. दरम्यान मोदी सरकारने लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली आहे. ‘अनलॉक’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. अनलॉक 2 मध्ये असणारी नियमावली केंद्र सरकारने जाहीर केली आहे. कोरोना व्हायरस, लॉकडाऊन आणि ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 30 Jun 2020 10:10 PM
भाजप आमदार निरंजन डावखरे यांचा ऊर्जामंत्र्यांवर निशाणा... हजारो मध्यमवर्गीय पर्याय नसल्याने घरात राहून काम करत आहेत. त्याबाबत सहानुभूतीऐवजी वर्क फ्रॉम होममुळे वीज बिल वाढले, हे ऊर्जामंत्र्यांचे वक्तव्य संतापजनक
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाण्यापाठोपाठ कल्याण-डोंबिवलीतही 12 जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.
राज्यात आज 4878 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 1951 रुग्ण कोरोनामुक्त, आज राज्यात 245 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा घरपोच देण्यास परवानगी, इतर सगळी दुकानं, आस्थापना बंद राहणार
राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्त झालेल्या संजय कुमार यांनी अजोय मेहता यांच्याकडून आज पदभार स्वीकारला, यावेळी विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांनी उपस्थित राहून नवनियुक्त मुख्य सचिवांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात अखेर पूर्णतः लॉकडाऊनची घोषणा, आयुक्त विपीन शर्मा यांनी परिपत्रक काढून दिले आदेश, 2 जुलै सकाळी 7 वाजल्यापासून ते 12 जुलै सकाळी 7 वाजेपर्यंत पूर्णतः लॉकडाऊन, अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त इतर कोणालाही बाहेर पडण्याची परवानगी नाही
Live Update | नागपूर केंद्रीय कारागृहातील 1 अधिकारी आणि 8 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, सध्या कारागृहातील एकूण कर्मचाऱ्यांना 2 टीममध्ये विभागून 15-15 दिवस आळीपाळीने कारागृहात काम करणे आणि पुढील 15 दिवस क्वॉरंटाईन राहणे, असं काम सुरू होते...
कोरोनाच्या नावाखाली मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराची मालिका सुरुच, गरजुंचे पोट भरण्याच्या नावाखाली महापालिका अधिकारी स्वत:चेच पोट भरतायेत, भाजपचा आरोप ;

गरजुंना अन्नवाटपाच्या नावाखाली 70 लाख जेवणाच्या पाकीटांसाठी निवीदा प्रक्रीया न करताच ई कोटेशनद्वारे मुंबई महापालिकेचं 63 कोटींचं काढलेलं कंत्राट तातडीनं रद्द करण्याची भाजपची मागणी
अकोल्यात आणखी 9 नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील कोरोना रूग्णांचा एकूण आकडा 1545 वर पोहोचला आहे. आज दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना मृतांचा आकडा 79 वर पोहोचला आहे. तर 1093 रूग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 373 रूग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवारांनी देहूत संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. परंपरेनुसार बारामतीत पालखी आल्यानंतर पवार कुटुंबीय काटेवाडीत पादुकांचे दर्शन घेत आणि तिथंच मेंढ्यांचे रिंगण सोहळा पार पडतो. पण यंदा कोरोनामुळं यात खंड पडला. ज्या कोरोनामुळं हा खंड पडला त्या कोरोनातून मुक्त करावं, असं साकडं पार्थनी घातलं आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 252 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामध्ये 151 पुरूष, 101 महिला आहेत. आतापर्यंत एकूण 5535 कोरोना बाधित आढळले असून 2669 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 259 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता 2607 रुग्णांवर उपचार सुरु झाली आहे.
अभिनेता आमीर खानच्या काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना तातडीने क्वॉरन्टाईन केलं असून बीएमसीने तातडीने वैद्यकीय मदत केली, अशी माहिती आमीरने ट्विटरवर दिली.

पंढरपूर - आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला चंद्रभागेचे सर्व घाट सील करण्यात आले आहेत. त्यामुळे चंद्रभागा नदीत कोणालाही स्नान करता येणार नाही. कोरोना संकटामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
सोमवारी दिवसभर मुंबईकरांना ट्राफिक समस्येचा सामना करावा लागल्यानंतर आजही अशीच परिस्थिती निर्माण होते की काय अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबईतील वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता रविवारी घोषणा केली की, 2 किलोमीटरचा परिसर सोडून नागरिकांनी बाहेर जाऊ नये. परंतु आज विनाकारण बाहेर पडणाऱ्यांची संख्या पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे वाहतूक समस्या निर्माण होत आहे. याचा फटका अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, अम्ब्युलन्स यांना बसू शकतो.
सोमवारी दिवसभर मुंबईकरांना ट्राफिक समस्येचा सामना करावा लागल्यानंतर आजही अशीच परिस्थिती निर्माण होते की काय अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबईतील वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता रविवारी घोषणा केली की, 2 किलोमीटरचा परिसर सोडून नागरिकांनी बाहेर जाऊ नये. परंतु आज विनाकारण बाहेर पडणाऱ्यांची संख्या पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे वाहतूक समस्या निर्माण होत आहे. याचा फटका अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, अम्ब्युलन्स यांना बसू शकतो.
ठाण्यातून मुंबईत जाणाऱ्या वाहनांची कोंडी झालेली आपण काल पाहिली होती. आज मात्र ही वाहतूक कोंडी दिसून येत नाही. पूर्व द्रुतगती मार्गावरील मुलुंड इथल्या टोल नाक्यावर आज वाहनांच्या रांगा नाहीत. काल पोलिसांनी जी धडक कारवाई केली त्याचा परिणाम आज दिसून येत आहे. काल अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडणाऱ्या अनेक वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे आज वाहनांची कोंडी दिसून आली नाही.
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवलं आहे. शिवशाही बसमधून नाथांच्या पादुका मार्गस्थ झाल्या. पालखीसोबत टाळकरी, झेंडेकरी, विणेकरी, चोपदार यांच्यासह निवृत्तीनाथ संजीवन समाधी मंदिर विश्वस्त वैद्यकीय पथक मार्गस्थ झालं. त्याआधी मंदिरापासून कुशावर्त तीर्थपर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. तीर्थात मंगलस्नान झाल्यानंतर पालखी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर प्रवेशद्वाराजवळ त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांनी पालखीचे स्वागत केलं. त्यानंतर पालखी मार्गस्थ झाली.
कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह येऊनही कोरोनाच्या भीतीने शिक्षकाने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. चंद्रशेखर तळवार असं आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचं नाव आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेंद्रे रोडवरील घटना असून सासरवडीत गळफास घेवून शिक्षकाने आत्महत्या केली आहे. तसेच एकलकोंडेपणातून आत्महत्या केल्याच समोर आलं आहे.
आळंदीमधून ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका आज पंढपूरला रवाना होणार आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून पादूका पंढरपूरला नेण्यात येतील. दुपारी 1 वाजता बस निघेल. या बसमध्ये 20 मानकरी असतील. ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराच्या समोर ज्या बसमधून पादुका नेण्यात येणार आहेत.
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील एक कर्मचाऱ्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, प्रशासनाची डोकेदुखीत वाढ, आज जिल्हाधिकारी कार्यालय पूर्णपणे सॅनिटाईज करण्यात आले आहे. पालघर जिल्हाधिकारी यांनी काल पासून तहसीलदार कार्यालयांत बसून कामकाज पाहिले
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 4 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. परंतु, अद्याप मोदी आज बोलताना कोणत्या विषयावर जनतेला संबोधित करणार, हे समजलेलं नाही. परंतु, असं म्हटलं जात आहे की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ते विविध मुद्द्यांवर जनतेशी संवाद साधतील. याव्यतिरिक्त असा अंदाज बांधण्यात येत आहे की, सध्या भारत-चीन यांच्यातील वाढत्या तणावांबाबतही पंतप्रधान काही गोष्टी स्पष्ट करू शकतात.
सांगलीत मुसळधार पावसाची हजेरी, जोरदार पावसामुळे विटा-खानापूर रोडवर पाणीच पाणी साचलं

उधारीच्या पैशाच्या वादातून गुंडाने साथीदाराच्या मदतीने अपहरण करुन युवकाला पेट्रोल पंपावर आणून त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न करत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. सर्व घटना cctv मध्ये कैद झाली आहे.
राज्यात सलग चौथ्या दिवशी 5 हजारांहून अधिक रुग्ण. राज्यात आज 5257 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 169883 अशी झाली आहे. आज नवीन 2385 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 88960 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 73298 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

सोलापूर मनपा आयुक्त पी. शिवशंकर कोरोना पॉसिटिव्ह. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणाऱ्या यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारीच पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
पुण्यातील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश. बँक मॅनेजर, सॉफ्टवेअर इंजिनिअरसह सेक्स रॅकेट चालणाऱ्या चौघांना अटक. चार महिलांची सुटका. पुण्यातील पाषाण परिसरातील उच्चभ्रू सोसायटीत सुरू असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केलाय. हे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या बँक मॅनेजर, सॉफ्टवेअर इंजिनिअरसह चार जणांना पोलिसांनी अटक केली. तर चार पीडित महिलांची यावेळी सुटका करण्यात आली.
बिट मार्शलला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना, भाजपच्या नगरसेवकांना अटक; न्यायालयाने सुनावली दोन दिवसांची पोलीस कोठडी.


शिवसेना नगरसेवक भागवत आरोटे आणि भाजप नगरसेवक राकेश दोंदे अशी नगरसेवकांची नावे आहेत. दोघांनी साथीदारसह ड्युटीवर असणाऱ्या पोलिसाला मारहाण केली होती. विष्णू गावित असं बिट मार्शलचं नाव आहे. भागवत आरोटे यांच्या भावाचा रात्री अपघात झाला. त्यावेळी गाडी बाजूला घेत असताना बिट मार्शलनेच अपघात केल्याचा समज करून मारहाण केली.
ठाणे जिल्ह्यात पुढील दहा दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

लॉकडाऊन काळात सरकारने जे दूध 25 रुपये लिटर प्रमाणे गेली 3 महिने शेतकऱ्यांकडून विकत घेतले. ती स्कीम पेरणीच्या काळात शेतकऱ्याला मदत व्हावी म्हणून जुलै महिन्यातही पुढे सुरू ठेवण्याचा अत्यंत महत्वाचा निर्णय दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी घेतला आहे. राज्यात सरकारने 3 महिने दुधाला भाव दिला म्हणून दुधाचे भाव पडले नाही, नाहीतर परत एकदा रस्त्यावर दूध फेकण्याची वेळ ढासळलेल्या डिमांडमुळे शेतकऱ्याला अनुभवायला मिळाली असती.
दोन जुलैपासून पुढील 10 दिवस ठाणे शहरात संपूर्ण लोकडाऊन जाहीर करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र मिशन बिगीन अगेन अंतर्गतचा दुसरा टप्पा 31 जुलैपर्यंत वाढवला. राज्यात सध्या आहे तेच नियम लागू असणार आहेत.
भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. आज सकाळी या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सुदैवाची बाब म्हणजे कुटुंबातील इतर सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. 23 जूनला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लांडगे पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात पाहणीसाठी गेले होते. तर लांडगे यांच्या घरीच फडणवीस यांच्या जेवणाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर लांडगे यांना कोरोनाची लक्षणं आढळून आली होती.
आता नऊऐवजी दहा संतांच्या पादुका आषाढीला येणार आहेत. निळोबा रायांच्या पादुकांनाही परवानगी मिळाली आहे. यापूर्वी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम या मानाच्या सात पालखी सोहळ्यांसह रुक्मिणी माता आणि चांगले वाटेश्वर या नऊ पालख्यांच्या पादुकांना परवानगी मिळाली होती.
100 लोकांसोबत पालखी घेऊन जाण्याच्या परवानगीसाठी वारकरी सेवा संघाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
अकोल्यात आणखी 22 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील कोरोना रूग्णांचा एकूण आकडा 1532 वर पोहोचला आहे. जिल्ह्यातील कोरोना मृतांचा आकडा 77 वर पोहोचला आहे. तर 1075 रूग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झासे आहेत. सध्या 380 रूग्णांवर उपचार सुरु आहेत.
देशात दररोज पेट्रोल डिझेलचे दर वाढत असल्याने आज काँग्रेसने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. त्यामुळे आज अमरावतीत काँग्रेसच्या वतीने अमरावतीच्या इर्विन चौकात धरणे आंदोलन सुरु केलं आहे. इंधन दरवाढीचे फलक हातात घेऊन केंद्र सरकारचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी इंधनाचे दर कमी करा अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर उपस्थित आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीचा अपघात झाला आहे. द्रुतगती मार्गावरून पुण्याहून मुंबईला जाताना सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली. गाडी स्लिप झाल्याने पलटी झाली, गाडीतील पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाली आहेत. शरद पवारांची गाडी सुखरुप मुंबईला रवाना झाली आहे.
पाकिस्तान : कराची स्टॉक एक्सेंजवर दहशतवादी हल्ला झाला असून गोळीबार करत दहशतवादी स्टॉक एक्सेंजमध्ये घुसले. पोलिसांकडून तीन दहशतवाद्यांचा गेटवरच खात्मा करण्यात आला आहे.
एक्स्प्रेस वेवरुन पुण्याहून मुंबईला येत असताना पिंपरीत शरद पवार यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीला अपघात, पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी, शरद पवार सुखरुप, मुंबईच्या दिशेने रवाना
रायगड : मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर भिषण अपघात झाला असून अपघातात 2 जण ठार झाले आहेत. बोरघाटातून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर चार वाहनांचा अपघात झाला. दोन कार, कंटेनर, ट्रक चा अपघात, दोन ठार तर चार जखमी झाले आहेत.
सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा एक हजारांच्या पार गेला आहे. काल 39 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1012 पोहोचली आहे. त्यापैकी 713 रुग्णा बरे होऊन परतले आहेत. तर आतापर्यंत 42 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दरम्यान, रात्री उशिरा मिळालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी 20 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा आता 580वर पोहोचला आहे. दरम्यान, आतापर्यंत 430 जणांनी कोरोनावर मात केली असून 25 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पण, सध्याच्या घडीला दररोज वाढणारा कोरोनाबाधितांचा आकडा हा जिल्हावासियांकरता काही प्रमाणात का असेना पण चिंता वाढवणारा आहे.
हिंगोली : हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील बन बरडा येथे रात्री झालेल्या मुसळधार पावसाने पक्के बांधकाम केलेली विहीर गायब झाली आहे. एक वर्षापूर्वी विहिरीचे सिमेंट आणि लोखंडी गजाने 15 कड्याचे बांधकाम केले होते. परंतु पावसाने जमीन खचली आणि रातोरात विहीर गायब झाली आहे. मागील वर्षी देखील जमिनीचा काही भाग खचला होता. मात्र यावर्षी उर्वरित विहीरच गायब झाल्याने शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे. अभिमान नांगरे असं या शेतकऱ्याच नाव असून आज सकाळी त्यांनी शेतात फेरफटका मारला असता हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.
रत्नागिरी जिल्हावासियांचे डोळे आता वरूणराजाच्या आगमानाकडे लागले आहेत. कारण, आठवडाभरापासून जिल्ह्यातून पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे शेतीची कामं देखील खोळंबली आहेत. काल संध्याकाळपासून जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस कोसळेल असं वातावरण असलं तरी अद्याप देखील मुसळधार पावसाची प्रतिक्षा आहेत. जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. तर, काही भागांमध्ये पावसाची रिपरिप आणि काही भागांमध्ये पावसाची प्रतिक्षा असं सध्याचं वातावरण आहे. परिणामी आता वरूणराजाच्या या लहरीपणा आणि अनियमिततेमुळे जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाला असून त्याच्यावर आता दुबार पेरणीचं संकट घोंगावताना दिसत आहे.
पंढरपूरमध्ये उद्या म्हणजे 30 जून दुपारी दोन वाजल्यापासून 2 जुलैपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी ही माहिती दिली.
मुंबईत काल म्हणजेच 28 जून रोजी सात हजारांपेक्षा अधिक वाहनं जप्त केल्याची माहिती पोलिसांनी ट्विटरद्वारे दिली. मुंबई पोलिसांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे आहे की, 28 जून रोजी 7000 हून अधिक नागरिकांनी औपचारिक/वैद्यकीय कारण किंवा आपत्कालीन परिस्थिती नसताना वाहने बाहेर काढून टप्प्याटप्प्याने होत असलेल्या अनलॉकच्या नियमांचे उल्लंघन केले. शहर व्यवस्थितपणे 'अनलॉक' करण्यासाठी मुंबईकर सर्व नियमांचे पालन करून आम्हाला साथ देतील अशी आम्ही आशा करतो.


राज्यात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत 5 हजारांहून अधिक वाढ, आज राज्यात 5493 रुग्ण आढळले, 2330 रुग्ण कोरोनामुक्त, तर आज 156 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
राज्यात 3 हजार पोलीस कोरोना पॉझिटिव्ह. मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना 65 लाख रुपयांची मदत. तर 8 हजार पोलिसांची भरती थांबली होती, ती पूर्ववत करण्याचा विचार सुरू आहे : गृहमंत्री अनिल देशमुख
राजीव गांधी फाउंडेशनच्या निधीवरुन काँग्रेसचा पलटवार. चीनबरोबर कुरुबुरी सुरू असताना पीएम फंडात निधी आला का? हुवाई, टिकटॉक, पेटीएम या कंपन्यांनी निधी दिला का? निधी आला असेल तर त्याचा हिशोब काय? प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा भाजपला सवाल.


हुवाई कंपनीने पीएम फंडाला सात कोटी रुपये निधी दिल्याची चर्चा असून सदर कंपनी वादग्रस्त असून हिचा आणि चीनच्या लष्कराचा संबंध असल्याचा बाळासाहेब थोरात यांनी आरोप केला आहे. काँग्रेस हे प्रश्न वारंवार उपस्थित करणार असून त्याचे स्पष्ट उत्तर मिळेपर्यंत आम्ही प्रश्न विचारणार. लोकशाहीचा आमचा अधिकार आम्ही बजावत असून हे प्रश्न विचारत राहणार असल्याचे थोरात म्हणाले.
बीड : अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर, पाटोदा, राडी परिसरात रविवारी दुपारी तुफान पाऊस झाला. ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले. शेतकऱ्यांनी पेरलेले व उगवलेले पिक दिसेनासे झाले. नद्या-नाले ओसंडून वाहू लागले.
कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनलॉक काळात देखील सलून व्यवसाय बंद ठेवण्यात आला होते. नाभिक समाजाच्या मागणीनंतर शासनाने नियम व अटिशर्तींवर राज्यातील सलून सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, भिवंडीतील सलून व्यावसायिकांना आपली दुकाने सुरु करण्यासाठी अजूनही 3 जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
पुणे : चाकण बाजार समिती 30 जूनपर्यंत बंद ठेवण्यात येणार, बाजार समितीमधील एका आडत्याला कोरोनाची लागण झाल्याने निर्णय, सुदैवाची बाब म्हणजे हा कोरोनाग्रस्त आडती गेली दहा दिवस बाजार समितीत आला नव्हता, मात्र तरीही खबरदारी म्हणून संपूर्ण बाजार समिती निर्जंतुक केली जाणार, यासाठी बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय झाला...


पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी अटकेत असलेला प्रमुख संशयित अमोल काळे याने वापरलेल्या सीमकार्डचा तपास पोलिसांनी हाती घेतला आहे. गौरी लंकेश यांची हत्या व्हायच्या अगोदर दीड वर्षांपूर्वी 1 जानेवारी 2016 अमोल काळे बेळगावातील एका झेरॉक्स सेंटरला गेला होता. तिथे संतीबस्तवाड गावातील एका तरुणाच्या आधार कार्डचे झेरॉक्स देऊन आयडिया कंपनीचे सिमकार्ड घेतलं होतं.
देशाचे नेते शरद पवार यांच्यावर *गोप्या पडळकर* याने जी व्यक्तव्य केल त्याचा निषेध करतो....विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेच बोलविता धनी असल्याची टीका हसन मुश्रीफ यांनी केली...कितीही टोकाचे मतभेद असले तरी असं वक्तव्य योग्य नाही
30 जूननंतर मुंबईसाठी काय आहे सरकारचा प्लॅन? मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरात लॉकडाऊन अधिक कडकपणे लागू करण्याबाबत होणार विचार. कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार उचलणार कडक पावलं. यासाठी उद्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात मुख्य सचिव, मुंबई पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होणार आहे. मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, दहिसर या भागांवर करणार लक्ष्य केंद्रित करणार. क्लस्टर लॉकडाऊनच्या पर्यायांची होणार चाचपणी.

ठाणे जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर पुन्हा काही विभागात कोरोना विषाणू संसर्ग बाधीत रुग्णं वाढत असल्याचं दिसून आलंय. त्यामुळे ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण-डोंबीवली, उल्हासनगर या महानगर पालिका क्षेत्रात कोरोना संसर्ग वाढणाऱ्या विभागात पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षेसाठी लॉकडाऊन करण्यात येत असल्याची माहीती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
विदर्भात झपाट्यानं कोरोना रूग्णांची संख्या वाढत असलेल्या अकोल्यात कोरोनाचं नवं 'व्हॉटस्पॉट' ठरतंय येथील जिल्हा कारागृह. आज जिल्हा कारागृहातील तब्बल 50 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याची बाब उघड झाली. त्यामुळे अकोला जिल्हा कारागृहातील कोरोनाबाधित कैद्यांचा आकडा पोहोचलाय 68 वर. एकाच दिवसांत 50 रूग्ण आढळल्यानं जिल्हा कारागृह प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, कारागृहात कोरोनाचा शिरकाव नेमका कसा झालाय याचा शोध आता प्रशासन घेतंय. दरम्यान, जिल्हा कारागृहातच कैद्यांसाठी कोविड केअर सेंटर उभारण्याचे आदेश अकोल्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. सध्या अकोल्यातील कारागृहात 349 कैदी आहेत. अकोल्यातील रूग्णांचा आकडा आज 1498 वर पोहोचलाय. आतापर्यंत 76 रूग्णांचा कोरोनामूळे मृत्यू झालाय. तर 1047 रूग्ण रोगमुक्त झाले आहेत.
मुंबई : सेनाभवनला कोरोनाचा विळखा,

शिवसेना भवनात आणखी तीन जणांना कोरोनाची लागण,

सेनाभवनात कार्यालयीन काम पाहणाऱ्यांना कोरोना,

यापूर्वी कोरोना रुग्ण आढळल्याने सेनाभवन निर्जंतुकीकरण करून सील करण्यात आले होते.

मात्र तरीही सेनाभवनाभोवती कोरोनाचा विळखा वाढत आहे.
नागपुरात शिवसेना प्रणित युवा सेनेचा जिल्हाध्यक्ष विक्रम राठौडच्या विरोधात खंडणीचा गुन्हा नोदंवण्यात आलं आहे. विक्रम राठौडने एका फायनान्स कंपनीच्या मालकाला खंडणी मागितल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी फायनान्स कंपनीच्या मालकाच्या तक्रारीवर खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंदवत युवा सेनेचा जिल्हाध्यक्ष विक्रम राठौडच्या भावाला अटक केली आहे. तर विक्रम राठौड फरार झाला आहे.
रेंट अ बाईक सेवा देणाऱ्या बाऊन्स या दुचाकी भाड्याने देणाऱ्या कंपनीने महानगरपालिकेची परवानगी घेतली नाही आणि भूभाडे दिले नाही म्हणून महानगरपालिकेने बाऊन्स कंपनीच्या 32 दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत.
व्हॉइस ओव्हर-कंपनीने दंड आणि भूभाडे भरल्यावर या दुचाकी कंपनीला देण्यात येणार आहेत.जप्त केलेल्या दुचाकी महानगरपालिकेच्या आवारात ठेवण्यात आल्या आहेत.काही महिन्यांपूर्वी बेळगावात बाऊन्स कंपनीने दुचाकी भाड्याने देण्यास प्रारंभ केला होता.महानगरपालिकेची परवानगी घेतली नसल्यामुळे आणि वाहने थांबवत असलेल्या जागेचे भूभाडे भरले नसल्यामुळे महानगरपालिकेने बाऊन्स कंपनीच्या 32 दुचाकी जप्त केल्या आहेत.कंपनीने दंड भरल्यावर या 32 दुचाकी कंपनीला महसूल विभाग परत देणार आहे.लॉक डाऊन नंतर सगळे व्यवहार सुरु झाले आहेत पण बाऊन्स कंपनीने अद्याप दंड भरून वाहने ताब्यात घेण्यासंबंधी कोणतीही हालचाल केलेली नाही.
आषाढी यात्रा 2 दिवसावर आली असताना पंढरपूर शहरात प्रदक्षिणा मार्गावर कोरोनाग्रस्त आढळल्याने प्रशासन हादरले, अनेकांच्या संपर्कात असल्याने भीतीचे वातावरण, पण मानाच्या पादुकांना प्रदक्षिणा करता येणार
'राज्याचा सरकार कसलं धर्मनिरपेक्ष सरकार आहे, या सरकारला बुद्धी आहे की नाही' असे प्रश्न विचारत लोकजागृती मोर्चा आणि लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीने नागपुरात टाळ मृदंग वाजवत आंदोलन केले. या आंदोलनात यज्ञ करत राज्य सरकारला बुद्धी यावी आणि प्रातिनिधिक स्वरूपात काही वारकऱ्यांना रेल्वेने पंढरपूरला जाण्याची परवानगी देण्यात यावी यासाठी यज्ञ ही करण्यात आले. विदर्भ आणि मराठवाड्यातून किमान 5 लाख वारकरी विविध पालख्यांसह पंढरपूरला जातात. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारीची अनुमती नसली तरी काही जुन्या पालख्यांना निवडक वारकऱ्यांसह पंढरपूर ला जाऊ द्यावे. त्यासाठी पालखी स्पेशल ट्रेन चालवावी अशी मागणी लोकजागृती मोर्चा आणि लोकनायक बापूजी अणे स्मारक समिती ने राज्य सरकारकडे केली होती. त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयांना पात्र ही पाठवण्यात आले होते. मात्र, आंदोलन करणाऱ्या वारकऱ्यांचा आरोप आहे की मुख्यमंत्री कार्यालयातील प्रशासनिक अधिकाऱ्यांनी वारकऱ्यांची मागणी पर्यटनाची मागणी असून कोरोना संकट काळात पर्यटनासाठी परवानगी देता येणार नाही. नेमकं याच मुद्द्यावरून विदर्भातील वारकरी चिडले असून सरकारचे डोके ठिकाणावर आहे की नाही असा प्रश्न विचारत त्यांनी नागपुरच्या रेशीमबाग परिसरात टाळ मृदंग वाजवत सरकार विरोधात आंदोलन केले आणि विठ्ठला या सरकारला सद्बुद्धी दे अशी मागणी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वे मंत्र्यांशी बोलून विशेष श्रमिक एक्स्प्रेसच्या धर्तीवर पालखी एक्स्प्रेस चालवण्याची व्यवस्था करावी अशी मागणी ही आंदोलकांनी केली आहे.
#Unlock काळात आपल्याला दोन गोष्टींवर भर द्यायचा आहे, कोरोनाला हरवायचे आहे आणि अर्थव्यवस्थेला अधिक मजबूत बनवायचे आहे. लॉकडाऊनपेक्षा जास्त सतर्कता आपल्याला अनलॉकच्या काळात बाळगायची आहे : : पंतप्रधान नरेंद्र मोदी
बीड :

सोयाबीनचे बियाणे उगवून न आल्याने संतप्त शेतकर्‍यांनी केला दुकानदाराच्या समोर आत्मदहनाचा प्रयत्न ,

अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले बीड जिल्ह्यातील नांदुर घाट परिसरातील धक्कादायक घटना, प्रसंगावधान साधून दुसरा शेतकर्‍यांने रोखले म्हणून अनर्थ टळला,

दोनशे शेतकऱ्यांचे बियाणे उगवून आले नाही त्यामुळे नव्याने दुबार पेरणी साठी बियाणे आणि खत आणावे कुठून? असा सवाल,

सोयाबीनचे बियाणे न उगवल्याने कृषी दुकानदार समोर आत्मदहनाचा प्रयत्न लालासाहेब दादाराव तांदळे या फक्राबाद येथील शेतकऱ्याने केला आहे.

फक्राबाद गावचे सरपंच नितीन बिक्कड यांनी प्रसंगावधान साधून अंगावर पाणी टाकले, गावातील दोनशे शेतकऱ्यांच्या बाबतीत सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याचे उघड झाले आहे. कृषी विभाग व पंचनामे केले मात्र मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांना टोकाचे पाऊल उचलले
पुण्यात रात्रभरात 240 नवीन कोरोना रुग्णांची नोंद. पुण्यातील रुग्णांची संख्या 20263 तर आत्तापर्यंत 693 कोरोना बाधितांचा मृत्यू, एकूण डिस्चार्ज रुग्णांची संख्या 11942 वर
अनलॉकमध्ये जास्त काळजी घेणं गरजेचं, नागरिकांनी निष्काळजी करु नये, सॅनिटायझर, मास्कचा वापर अत्यावश्यक : पंतप्रधान नरेंद्र मोदी
रत्नागिरी जिल्ह्याची चिंता आता काहीशी वाढली आहे. कारण, रत्नागिरी जिल्हा रूग्ण्यालयामध्ये प्रसुतीसाठी दाखल केलेल्या सहा मातांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर आता 14 गरोदर मातांना क्वारन्टाईन देखील करून ठेवण्यात आले आहे. शिवाय, या 14 मातांसह नवजात बालकांचे स्वॅब देखील घेतले गेले आहेत. त्यामुळे आता नवजात बालक आणि मातांच्या अहवालाची प्रतिक्षा आहे. दरम्यान, प्रसुती वॉर्डमध्ये काम करणाऱ्या एका नर्सला देखील कोरोनाची लागण झाली आहे. रत्नागिरी जिल्हा रूग्णालय हे कोरोना रूग्णालय करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा आता 554च्या देखील पुढे गेला आहे.
जगाने, या काळात भारताच्या विश्वबंधुत्वाच्या भावनेचीही अनुभूती घेतली आहे, भारत आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज 28 जून 2020 रोजी दुपारी 1:30 वाजता महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करणार, अनलॉक 2 संदर्भात घोषणा करण्याची शक्यता
संकट आल्याने कोणतही वर्ष वाया जातं नाही, आतापर्यंत अनेक संकटातही भारताने विकास केला : पंतप्रधान नरेंद्र मोदी

डिफेन्स, इन्कम टॅक्स सह जीएसटी, कस्टम आदी केंद्रीय कर्मचारी आणि पोस्ट ऑफिस मधील कर्मचाऱ्यांना मुंबई लोकल ट्रेन मधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे, आशिष शेलार यांची माहिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात वीज अंगावर पडून लोरे येथील शेतकऱ्याचा मृत्यू, मयत लवू मांडवकर आचिर्णे घाणेगडवाडी येथील शेतात भात लागवडीचे काम करत होते. विजांचा जोरदार कडकडाट झाला आणि विजेचा लोळ त्यांच्या अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांना फोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे सांगितले. वैभववाडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधिताचा आकडा एक हजाराच्या दिशेने,
रात्री उशीरा 37 रुग्णांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह,
काल दिवसभरात 84 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह,
सातारा जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 975,
आजपर्यंत 711 रुग्णांना उपचार देऊन सोडले,
तर आजपर्यंत 42 बाधित दगावले
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात औषधाचा घोटाळा सुरू असल्याचा आरोप औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. या औषध घोटाळ्याला जबाबदार असणाऱ्या अधिष्ठाता यांना निलंबित करण्याची मागणी देखील जलील यांनी केली. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयामध्ये एक महिला प्रसूत झाली. तिच्या पतीला औषधासह मास्क, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज अशा जवळपास सात हजार रुपयांच्या औषधी बाहेर आणण्यास सांगितले, असा आरोप देखील जलील यांनी केला आहे. एकीकडे अधिष्ठाता अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये घाटी रुग्णालयात मुबलक औषधे असल्याचं सांगतात, तरीही रुग्णांना बाहेरुन औषधे का मागवता आणि एजंटच्या माध्यमातून रक्त आणण्यासाठी का लावले जाते. याची चौकशी करण्याची मागणी देखील जलील यांनी केली आहे. त्यांच्यासोबत या पत्रकार परिषदेला सदरील महिलेचा पती शिवकुमार मुंडे हा देखील उपस्थित होते.
राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 5 हजारहून जास्त रुग्णांची नोंद, आज 5318 कोरोनाबाधित रुग्ण आढळले, आज 167 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू, आज 4430 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले, आतापर्यंत 84 हजार 245 रुग्णांची कोरोनावर मात
आरोग्यमंत्री राजेश टोपे
सोलापुरातील मृत्यूदर जास्त का आहे, याची माहिती घेतली, उपचारातून बरे होणारे रुग्ण हे जास्त आहेत, काही रुग्ण रुग्णालयात आहेत, 17 टक्के रुग्ण हे कोरोनामुळे दगावले आहेत
'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांची बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक येथे बैठक. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव आणि मुंबई मापालिकेचे आयुक्त उपस्थित. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी आज ठाणे आणि उत्तर मुंबईतील कोरोना रुग्णांसाठी केलेल्या उपाययोजनांची पाहणी केली.
के.जे. सोमय्या रुग्णालयाला हायकोर्टाचा दणका, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कोरोना रूग्णांकडून केलेली भरमसाठ बिल वसूली भोवणार, रुग्णांकडून घेतलेले बिलाचे 10 लाख रूपये हायकोर्टात जमा करण्याचे निर्देश
पंतप्रधान फंडातून राजीव गांधी फाउंडेशनला पैसा का दिला? काँग्रेसने चीनसोबत करार केल्याचा भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा आरोप
नागपुरात महिलेच्या हत्येची घटना ताजी असताना आता ज्येष्ठ नागरिक असलेल्या डॉक्टरला गाव गुंडांची मारहाण. कारण काय तर डॉ. ज्ञानेश ढाकुलकर यांनी मंदिराजवळ उभे राहून अश्लील चाळे करणाऱ्या एका गुंडाला हटकले होते. गाव गुंडांची टोळी घटनेच्या दुसऱ्या दिवशी दिवसभर वस्तीत डॉ. ढाकुलकर यांचा शोध घेत फिरली आणि जेव्हा संध्याकाळी पोलीस घटनास्थळी येऊन गेले. त्यानंतर काही मिनिटांनी त्याच घटनास्थळी येऊन गुंडांनी डॉ ढाकुलकर यांना बेदम मारहाण केली. सुदैवाने वस्तीतील लोकांच्या प्रसंगावधानाने डॉक्टर ढाकुलकर बचावले. घटना घडलेल्या दत्तात्रय नगरातील नागरिकांनी आता सुरक्षेची मागणी करत गाव गुंडांच्या बंदोबस्ताची मागणी केली आहे.
1993च्या मुंबई बॉम्ब स्फोटातील दोषी युसुफ मेमनचा नाशिक मध्यवर्ती कारागृहात हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्यानंतर रात्री उशिरा त्याचा मृतदेह धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवविच्छेदन गृहात आणण्यात आला. याठिकाणी त्याच्या मृतदेहाच शवविच्छेदन करण्यात आलं.यानंतर त्याचा मृतदेह त्याचा भाऊ तसेच सोबत आलेल्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. युसूफ मेमनचा मृतदेह मुंबईकडे रवाना झालाय. शवविच्छेदन अहवाल मुंबई कारागृह प्रशासनाला कळवण्यात आलाय, तर शवविच्छेदनाच्या अहवालाची एक प्रत युसूफ मेमनच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, युवा पँथरच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी,

"महाराष्ट्रात दलितांवर होणारे अत्याचार थांबवा", धिक्कार असो, अशा घोषणा दिल्या,

युवा पँथरचे दोन कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात,

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोंधळ
अमरावती : डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे. 219 परिचरिकांना मागील तीन महिन्यांपासून वेतन नसल्याने पाच दिवसांपासून आंदोलन करत आहे. आंदोलनाची दखल कोणीच घेत नसल्याने अखेर आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे. या परिचारिका कोविड वॉर्डात सेवा देऊनही मूलभूत सुविधा मिळत नसल्याच परिचरिकांचा आरोप आहे.
गोपीचंद पडळकर यांच्या शरद पवारांवरील वक्तव्याचे आपण किंवा आपला पक्ष कुठलेही समर्थन करत नसून, शरद पवार हे केवळ आमचे राजकीय विरोधक असून ते आमचे दुश्मन नसल्याची प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. गेल्या चार दिवसांपासून गोपीचंद पडळकर यांच्या शरद पवारांच्या विषयीच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर राज्यभर राष्ट्रवादी आक्रमक झाली होती, यावर बोलताना दानवे यांनी ही प्रतिक्रिया दिली.
जालना जिल्ह्यातील परतूर येथे कानाला हेडफोन लावून रेल्वे रूळ ओलांडताना एका 19 वर्षाच्या तरुणाला जीव गमवावा लागलाय.करण हिवाळे असे या मयत तरुणाचे नाव असून आज सकाळी साडेआठच्या सुमारास परतूर येथून मार्गस्थ होणाऱ्या मालगाडीची या तरुणाला जोरदार धडक बसली, या धडकेत या तरुणाचा जागीच अंत झाला,मित्रांनी या तरुणाला आवाज देऊन बाजूला होण्याचे संकेत दिले होते मात्र कानात हेडफोन असल्याने या तरुणाचे लक्ष वेधण्यास ते मित्र असमर्थ ठरले, प्रत्यक्षदर्शी च्या माहिती नुसार रेल्वे फाटक पासून काही मीटर अंतरावर हा तरुण आपल्या घराकडे निघाला होता, मात्र सुरक्षित अंतर न ठेवता रेल्वे येण्याच्या विरुध्द दिशेने चालणाऱ्या या तरुणाला रेल्वेचा आवाज आला नाही, परिणामी रेल्वे रूळ ओलांडताना या तरुणाला जोरदार धडक बसली त्यात तो जागीच गतप्राण झाला.
पुलवामा येथील अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेल्या सुनिल काळे यांच्या कुटुंबातील एकाला शिक्षणानुसार शासकीय सेवेत घेण्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

पानगाव (ता. बार्शी) येथे शहीद काळे यांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन देशमुख, टोपे, भरणे यांनी आज सांत्वन केले.
गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतली शहीद सुनील काळे यांच्या परिवाराची भेट, पुलवामामध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले होते पानगाव येथील सुनील काळे, परिवाराचे सांत्वन करण्यासाठी गृहमंत्री आणि आरोग्यमंत्री दाखल
गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतली शहीद सुनील काळे यांच्या परिवाराची भेट, पुलवामामध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले होते पानगाव येथील सुनील काळे, परिवाराचे सांत्वन करण्यासाठी गृहमंत्री आणि आरोग्यमंत्री दाखल
नाशिक: शहीद कुटुंबीयांना 1 कोटी मदत केंद्र सरकार देणार, शहीद जवानाच्या वीरपत्नीला जवानाचा पगार मिळणार, तिन्ही मुलांना देशात जिथे शिक्षण घेतील तिथे मोफत शिक्षण मिळणार,
माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांची घोषणा, भामरे यांनी केंद्र सरकार संरक्षण मंत्री यांच्यावतीने श्रद्धांजली वाहिली
श्री करवीर निवासिनी अंबाबाईचे मंदिर दर्शनासाठी खुले करा,

अंबाबाई मंदिरातील श्रीपूजकांची सरकारकडे मागणी,

गेल्या चार महिन्यापासून राज्यातील सर्व मंदिरे भाविकांना दर्शन घेण्यासाठी बंद,

मंदिरावर अलवलंबून सर्व घटकांवर त्याचा परिणाम होतोय,

अनेक छोट्या मोठ्या व्यवसायांना आर्थिक फटका बसला- श्रीपूजक
देहू आणि आळंदी येथून माऊलींच्या पादुका एसटीतून जाणार हे जवळपास निश्चित झालं आहे. तशा प्रकारच्या सूचना ही मिळाल्याचं दोन्ही संस्थानांनी दुजोरा दिला आहे. दशमीच्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका एसटीतून पंढरपूरकडे रवाना होतील.
शहीद जवान सचिन मोरे यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात, सकोरी गावातील निवासस्थानापासून निघाली अंत्ययात्रा, थोड्यावेळात शहीद जवान सचिन मोरे यांचे पार्थिव अंत्यसंस्कार स्थळी येणार,
पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे उपस्थित, 'वीर जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, आमच्या सुपुत्राचा आम्हाला अभिमान आहे', कृषी मंत्री दादा भुसे यांची प्रतिक्रिया
देशातील कोरोनाबाधितांची संख्या 5 लाखांवर, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येत आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ,

कोरोनाबाधितांची संख्या 18 हजार 552 ने वाढली तर मृतांचा आकडा 384 ने वाढला,

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 लाख 8 हजार 953,

त्यापैकी एकूण 2 लाख 95 हजार 881 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 58.13 टक्के,

सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 1 लाख 97 हजार 337

गेल्या 24 तासांत 10 हजार 244 रुग्ण बरे झाले, देशात एकूण मृतांची संख्या 15 हजार 685 वर
रत्नागिरी : सारी नामक तापाच्या साथीने आतापर्यंत जिल्ह्यात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना पाठोपाठ आणखी एका आजाराचे संकट जिल्ह्यावर आले आहे. आरोग्य यंत्रणेने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा रुग्णालय आणि शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पाठवलेल्या अहवालात सारी तापाने नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे कळवले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात आधारित आलेले 47 नागरिक दाखल झाले होते. 12 नागरिकांवर सध्या उपचार सुरु असून नऊ जणांचा सारी तापाने मृत्यू झाला आहे.
बुलडाणा : मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे बुलडाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील अनेक गावांना फटका बसला आहे. वानखेड,पातूरडा, बावनबीर परिसरात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्यामुुुळे वाण नदी व नाल्यांना पूर आला आहे. पावसाचा जोर आता कमी जरी झाला असला तरी अनेक गावांत विजेचा पुरवठा खंडित झाला आहे. या पावसामुळे हजारो हेक्टवरील पेरणीचे नुकसान झालं  आहे. सध्याच्या स्थितीत वान नदीवरील पुलावरून पाणी असल्याने इथली वाहतूकही विस्कळीत झाली आहे. बावनबीर परिसरात 85 सरासरी मिलिमीटर नोंद करण्यात आली आहे, पातूरडा इथं 55 मिलिमीटर नोंद झाली असून संग्रामपूर परिसरात 64 सरासरी मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
सुबक नाट्यसंस्था करणार ऑनलाईन मराठी थिएटर (ओएमटी), कलाकारांचे चार गट ऑनलाईन करणार सादरीकरण, शनिवार, रविवार रात्री 9 ते 10 होणार सादरीकरण, प्रेक्षकांना तिकीट काढून होता येणार सहभागी, 1 लाख आणि 75 हजार अशी दोन बक्षिसे, नवा प्रयोग
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 201 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, यामधील 125 रुग्ण मनपा हद्दीतील, 76 रुग्ण ग्रामीण भागातील , त्यामध्ये 114 पुरूष, 87 महिला, आतापर्यंत एकूण 4723 कोरोनाबाधित आढळले असून 2373 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 234 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आता 2116 रुग्णांवर उपचार सुरू
बोगस बियाणे प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाकडून सुमोटो याचिका.
लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली आणि नगर जिल्ह्यामध्ये बनावट सोयाबीन बियाणे विक्री झाली असून, त्यांची उगवणच झाली नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. बोगस बियाणे उत्पादित करणाऱ्या कंपन्या तसेच ते विक्री करणारे यांच्या विरोधात बियाणे निरीक्षकांकडे तक्रार देऊनही आवश्यक कारवाई न झाल्यास पोलिसांकडे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आणि त्या अनुषंगाने पोलिसांना कारवाईचे अंतरिम निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे दिले आहेत. एबीपी माझावर लागवडीनंतर सोयाबीन उगवण झालीच नसल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. त्याची दखल घेत खंडपीठाने स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली.
मनमानी करणाऱ्या गृह निर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना सरकारकडून अखेर चाप,

घर कामगार व वाहन चालक यांना प्रवेश प्रतिबंधित न करण्याबाबत सहकार विभागाने जारी केले परिपत्रक,

लॉकडाऊनच्या काळात अनेक सोसायट्यांमध्ये प्रवेश बंदी केल्याने वयोवृद्ध रहिवाशी आणि घर कामगारांचे होत होते हाल,

मात्र आता सहकार विभागाने सोसायटीच्या आवारात या श्रमिक वर्गाला प्रवेश बंदी नसल्याचे केले स्पष्ट,

तसेच शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे आणि मनमानी नियम तयार करू नये अशा स्पष्ट सूचना सरकारने गृह निर्माण संस्थांना दिल्या आहेत.
औरंगाबाद कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहून औरंगाबाद खंडपीठाकडून सुमोटो याचिका, खंडपीठाकडून प्रशासनाला विविध निर्देश, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याचे काम सोपवलेले अधिकारी, हजर न झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची माहिती देखील मागवली, त्यांच्या विरुद्ध गुन्हे नोंदवण्यासह योग्य ती कारवाई करण्याचे आणि त्यांची माहिती देण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. कोरोनाचा रुग्ण आणि मृतांची माहिती प्रशासनाला न देणाऱ्या खाजगी दवाखान्यांच्या आणि प्रयोगशाळेच्या विरोधात देखील कारवाई करून अहवाल खंडपीठाने मागवला आहे
गलवान खोऱ्यात देशाच्या सीमांचे रक्षण करत असताना वीरमरण आलेल्या शहीद जवान सचिन मोरे यांना आज अखेरचा निरोप दिला जात आहे, थोड्याच वेळात त्यांचावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, त्यांचे पार्थिव ज्या रस्त्याने जाणार आहे ते रस्ते फुलांनी सजविण्यात आले आहेत, आपल्या जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी नागरिक पहाटे पासूनच घराबाहेर पडलेत
नंदुरबार : शहरात काल झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. त्याभागतील वाहने पाण्याखाली आली होती. त्या भागातील नागरिकांना वाहने काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. शहरातील मंगळ बाजार परिसर आणि भोई गल्लीतील सखल भागात पाणी साचल्याने वाहन धरकांचे हाल झालेत तर कसरत करत वाट काढावी लागत होती. पाण्याचा निचरा झाल्याने या भागातील पाणी आता कमी झाले आहे.
सोलापूर : आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात व्हिडीओ पोस्ट केल्याप्रकरणी धमकीचे फोन, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांची पोलिसात तक्रार, पाटील यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तिविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल, गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या व्यक्तव्याविरोधात उमेश पाटील यांनी व्हिडीओ पोस्ट केला होता,

या पोस्टमुळे फोन करून धमकी दिल्याचा तक्रारीत उल्लेख
अंबाजोगाईच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कोरोना चाचणी प्रयोग शाळा यापूर्वीच सुरू केली असून यापुढे बीड शहरामध्ये सुद्धा covid-19 लॅब सुरू करू असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरामध्ये देशमुख यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी बोलताना देशमुख म्हणाले की, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाला कोविड लॅबचा शब्द आम्ही पाळला. अशीच लॅब बीडलाही सुरू करू, जेणेकरून चाचण्या लवकरात लवकर होतील. या लॅबसाठी तत्वत: मंजुरी देत असल्याची घोषणा करुन जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचनाही यावेळी अमित देशमुख यांनी दिल्या
लातूर जिल्ह्यात काल एकाच दिवशी 14 पॉझिटिव्ह रुग्ण, पाच जण कोरोनामुक्त, एकूण कोरोना रुग्ण संख्या 280, उपचार घेत असलेले कोरोना रुग्ण 73, कोरोनामुक्त रुग्ण 190, मृत्यू झालेले रुग्ण 15

पार्श्वभूमी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. अनलॉक 2 अंतर्गत मोदी सरकारने अनेक निर्बंध शिथील केले असून अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. 30 जून रोजी लॉकडाऊन संपत आहे. अनलॉकचा पहिला टप्पा सध्या सुरू आहे. दरम्यान मोदी सरकारने लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली आहे. ‘अनलॉक’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. अनलॉक 2 मध्ये असणारी नियमावली केंद्र सरकारने जाहीर केली आहे.


कोरोना विषाणूचा संसर्ग देशात झपाट्याने होताना दिसत आहे. मात्र, दुसरीकडे देशाची आर्थिक घडी बसवण्यासाठी लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्याचीही गरज आहे.


अनलॉक 2 ची नियमावली



  • या अगोदरचं घरगुती विमान उड्डाणांना मर्यादित स्वरुपात परवानगी देण्यात आली आहे. याची संख्या आता वाढवण्यात येणार आहे.

  • नाईट कर्फ्यू मध्ये आता शिथीलता देण्यात येणार आहे. आता रात्री 10 ते सकाळी पाच वाजेपर्यंत कर्फ्यू लागू राहिल. रात्री केवळ इंडस्ट्रियल यूनिट्स आणि अत्यावश्यक सामानाची वाहतूक करणारी वाहने, ट्रेन आणि विमानांना प्रवासाची मूभा असेल.

  • दुकानांमध्ये जागेनुसार एकाचवेळी पाच लोकांना प्रवेश देऊ शकतात. मात्र, यावेळी सोशल डिस्टन्सचं पालन करावे लागणार आहे.

  • केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रशिक्षण संस्था 15 जुलैपासून उघडण्यात येतील. यासाठी वेगळ्या स्वरुपात गाईडलाईन्स देण्यात येणार आहे.

  • राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांसोबत चर्चेनंतर शाळा, महाविद्यालय आणि कोचिंग संस्था 31 जुलैपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक 'वंदे भारत मिशन'च्या अंतर्गत मर्यादित स्वरुपात होती. आता ती नियोजन पद्धतीने वाढवण्यात येणार आहे.


कंटेनमेंट झोनबाहेर खालील गोष्टींना बंदी असणार



  • मेट्रो, रेल्वे

  • चित्रपट गृह, जिम, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, थिएटर, बार, ऑडिटोरियम, असेंबली हॉल आणि अशा प्रकारच्या अन्य सेवा बंद राहणार आहेत.

  • सामाजिक, राजकीय, खेळ, मनोरंजन, अॅकडमिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आणि इतर मोठ्या गोष्टींना बंदी असणार आहे. या सर्व गोष्टींना सुरू करण्यासाठी परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार आहे.

  • 31 जुलैपर्यंत कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन लागू असणार आहे. ज्या ठिकाणी कंटेनमेंट झोन नाही, अशा ठिकाणी काही प्रमाणात सूट देण्यात येणार आहे.

  • राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेश परिस्थिती पाहून कंटेनमेंट झोनच्या बाहेर काही गोष्टींवर निर्बंध आणू शकते.

  • राज्याच्या आतमध्ये किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात लोकांना येण्याजाण्यासाठी आणि वस्तूंची ने-आण करण्यासाठी सूट देण्यात आली आहे. यासाठी ई-पासची गरज लागणार नसल्याचे सांगण्यात आले नाही.

  • आरोग्य सेतू अॅप वापरण्यासाठी प्रोत्साहन देणे चालूच राहणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.