कोल्हापुरात सुरुवातीला चांगला पाऊस झाला. पण सध्या तिथंही पाऊस म्हणावा तसा बरसत नाही. जून महिन्यात इथं सरासरी 337 मीमी पाऊस पडतो पण आतापर्यंत फक्त 63 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात फक्त 16 टक्के पेरणी झाली आहे. ज्यांनी पेरणी केली ते शेतकरी आता पावसाची अतुरतेनं वाट बघत आहेत.
तिकडे चंद्रपुरातही अशीच स्थिती आहे. आतापर्यंत जिल्ह्यात फक्त ३५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या अत्यल्प पावसामुळे ज्या शेतकऱ्यांनी चांगला पाऊस पडेल या आशेनं कापूस आणि सोयाबीन यांची पेरणी केली होती ते आता चांगलेच संकटात सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्यानं वर्तवलेला अंदाज खरा ठरावा अशीच सर्वांची इच्छा आहे.