नागपूर : विदर्भात धुमाकुळ घालणाऱ्या नरभक्षक वाघिणीचा अखेर मृत्यू झाला आहे. बोर अभयारण्याच्या हद्दीत वीजेच्या धक्क्यानं वाघिणीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या नरभक्षक वाघिणीला जीवे मारण्याचे आदेश हायकोर्टानं दिले होते.


तब्बल चार महिन्यांचा प्रवास करुन घरी परतलेल्या टी-27 वाघिणीला ठार मारण्याच्या आदेशावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शिक्कामोर्तब केलं होतं. मात्र वन्यजीव प्रेमी या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची तयारी चालवली होती.
जंगलात असो वा बाहेर, 'त्या' वाघिणीला ठार मारण्याचे आदेश

वन खात्यानं वाघिणीला नरभक्षक ठरवल्याने ती आता सर्वसामान्य नागरिकांसाठी धोकादायक ठरली होती. त्यामुळे ती जंगलात असो वा बाहेर, तिला ठार मारण्याच्या आदेशावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं होतं.

ज्या ठिकाणी माणसांवर हल्ले झाले, तिथे हीच वाघीण असल्याचं सिद्ध झालं आहे, शिवाय दुसऱ्या कोणत्याही वाघाचं अस्तित्व तिथे नसल्याने या वाघिणीला ठार मारणं गरजेचं असल्याचं मत वनविभागाच्या वकिलांनी मांडलं होतं.