चंद्रपूर: केवळ नशीब बलवत्तर म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील धामणपेठ गावातील दोन लोकांचा जीव वाचला. तब्बल 4 ते 5 तास झाडावर आसरा घेऊन दोघांनी आपल्या मृत्यूला अक्षरश: हुलकावणी दिली.


चंद्रपूरमधील गोपीनाथ कुडमेथे आणि किशोर मडावी हे दोघे गाई चारण्यासाठी जवळच्या जंगलात गेले होते. मात्र त्याचवेळी आपल्या दोन बछड्यांसह वाघिण जवळच्या झुडपात विश्रांती घेत होती. मात्र, गोपीनाथ आणि किशोर यांना पाहताच वाघिण बिथरली आणि ती हल्ल्याच्या पवित्र्यात आली. त्यामुळं घाबरलेले गोपीनाथ आणि किशोर जवळच्या झाडावर चढले.

तब्बल 4 ते 5 तास दोघेही झाडावर बसून होते, आणि खाली झाडाला वाघिणीनं वेढा घातला होता. यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या मदतीनं दोघांना खाली उतरवलं. वाघिणीच्या वेढ्यातून दोघांना सोडवताना वनाधिकाऱ्यांना बरीच मेहनत करावी लागली.