मुंबई : राज्यात 18 ते 20 ऑक्टोबरदरम्यान वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात 18 ऑक्टोबरनंतर दुपारनंतर ढगाळ हवामानासह वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.


तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील काही भागात ढगाळ वातावरणासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


नाशिक, धुळे, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात 19 ते 20 नोव्हेंबरदरम्यान विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामानाची ही परिस्थिती पुढील आठवड्याच्या सुरुवातीला काही प्रमाणात कायम राहण्याची शक्यता आहे.


पिकांना सुरक्षित ठेवण्याचे शेतकऱ्यांना आवाहन


शेतकऱ्यांनी या हवामानाच्या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करताना काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे, असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे. वादळी पावसादरम्यान लोकांनी वादळ आणि वीजांपासून आपले संरक्षण करावे. वादळ आल्यास झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली आसरा घेऊ नये, असं आवाहन देखील करण्यात केलं आहे.