बीड : अफू लागवडीच्या प्रकरणातून तिन्ही आरोपींची सुटका झाली आहे. हे सहा वर्षांपूर्वीचे प्रकरण आहे. शेतमालक रघुनाथ श्रीपतीराव दराडे, बाळासाहेब श्रीपतीराव दराडे आणि वसंत श्रीपतीराव दराडे अशा तीन भावांची अफू लागवडीच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली आहे.


तिन्ही भावांवर अफूच्या झाडांची लागवड केल्याचा आरोप होता. मात्र तांत्रिक उणीवा लक्षात घेऊन, अंबाजोगाई येथील सत्र न्यायालयाने त्यांची सुटका केली.

27 फेब्रुवारी 2012 रोजी स्थानिक गुन्हे शाखेने महसूल विभागाच्या मदतीने परळी तालुक्यातील पोहनेर शिवारात छापा मारला आणि जवळपास 15 लाख रुपये किंमतीची अफूची झाडे जप्त केली होती. परवानगी न घेता अफूच्या झाडांची लागवड करण्याचा आरोप शेतमालक रघुनाथ श्रीपतीराव दराडे, बाळासाहेब श्रीपतीराव दराडे आणि वसंत श्रीपतीराव दराडे अशा तीन भावांवर होता. त्यांच्यावर सिरसाळा पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर पोलीस निरीक्षक एस. एल. मुंडे यांनी तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. याप्रकरणाची सुनावणी अंबाजोगाई येथील सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांच्या न्यायालयासमोर झाली.

या संपूर्ण प्रकरणात शेतमालक रघुनाथ श्रीपतीराव दराडे, बाळासाहेब श्रीपतीराव दराडे आणि वसंत श्रीपतीराव दराडे या तिघा भावांची न्यायालयात ॲड. विक्रम खंदारे यांनी बाजू मांडली, तर तर त्यांना ॲड. विकास काकडे यांनी सहकार्य केले.

अफू लागवडीप्रकरणी 2016 साली 25 जणांना शिक्षा

याच परिसरात अफूच्या झाडांच्या लागवडीप्रकरणी 2016 साली 25 जणांना दहा वर्षांची सक्तमजुरी आणि एक लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सध्या हे आरोपी जामिनावर बाहेर असून, त्यांनी शिक्षेविरोधात हायकोर्टात अपील केले आहे.