सांगली : तुम्ही तिघे एकत्र या ,नाहीतर चौघे या,आम्ही एकटे पुरेसे आहोत, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.तसेच जागत कोणावरही बोललो तरी मंत्री हसन मुश्रीफ माझ्यावर टीका का करतात हे कोडे सध्या माध्यमांनाही पडले आहे,असा टोलाही पाटील यांनी लगावला आहे. चंद्रकांत पाटील सांगली मध्ये पुणे पदवीधर मतदानाच्या निमित्ताने आले असता बोलत होते.


महाराष्ट्रात पार पडणाऱ्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीतील पुणे पदवीधर मतदार संघाच्या मतदानाच्या निमित्ताने सांगली दौऱ्यावर असलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सांगलीच्या चांदणी चौक येथील दमाणे हायस्कूल याठिकाणी असणाऱ्या मतदान केंद्राला चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली.


यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले, राज्यात पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीसाठी रांगेत उभे राहून मतदान करण्यात येत असून अत्यंत चांगला उत्साह मतदारांच्या मध्ये पाहायला मिळाले आहे. म्हणून भाजपाचा दावा आहे की, सहाच्या सहा जागा भाजप चांगल्या मताधीक्क्याने जिंकेल. विधान परिषदेमध्ये सध्या 60 असणाऱ्या आमदारांमध्ये 25 भाजपाची आहेत, त्यामध्ये ही सहा जोडली तर 31 होतील आणि विधान परिषदेत भाजपाचे बहुमत असेल. इतर सगळ्यांच्या मिळून 33 असतील. त्यामुळे महाराष्ट्रात आमचा प्रयत्न चालला आहे. तुम्ही तिघे एकत्र या, नाहीतर चौघे एकत्र ,मात्र आम्ही तुम्हाला एकटे पुरेसे आहोत,अशा शब्दात आमदार पाटील यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.


त्याचबरोबर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबाबत बोलताना म्हणाले, मी जगात कोणावरीही टीका केली,ती माणसे बोलत नाहीत,पण ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ माझ्यावर टीका करतात. हे आता सगळ्यांना कोडे पडले आहे, असा टोलाही आमदार चंद्रकांत पाटील यांनी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना लगावला आहे.