शिर्डी: साईसंस्थानचे विश्वस्त सचिन तांबे आणि मंदिर प्रमुख राजेंद्र जगताप यांना वीस लाखांच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या दोघांनाही एक निनावी पत्र धाडण्यात आलं आहे. पोस्टानं आलेल्या निनावी पत्रात ही धमकी देण्यात आली आहे.


वीस लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली असून ‘जर वीस लाख दिले नाहीत, तर बॉम्बनं उडवून देऊ.’ असंही या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, या पत्रामुळे शिर्डीत चांगलीच खळबळ पसरली आहे. याप्रकरणी अज्ञातांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शिर्डीतील व्यवसाय रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय शिर्डी ग्रामस्थ आणि पोलीस यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला होता. दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत असल्यानं शिर्डी पोलिसांची चिंता वाढली आहे.

संबंधित बातम्या:

शिर्डीतील एकमुखी दत्त मंदिराचा कळस चोरट्यांकडून लंपास
शिर्डीत रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत सगळे व्यवहार बंद राहणार