नागपूर : आणीबाणीच्या आंदोलनात जे तुरुंगात गेले, जे त्याविरुद्ध लढले त्यांना स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा देण्यात येणार असल्याची घोषणा आज (शुक्रवार) मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली. 2018 साली पहिल्या कॅबिनेट बैठकीत राज्य सरकार याबाबत निर्णय घेणार आहे.


स्वातंत्र्यसैनिकाच्या दर्जासोबतच त्यांना पेन्शनही मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. गेल्या अनेक दिवसांपासून याविषयी मागणी लावून धरली होती. अखेर आज याबाबत घोषणा करण्यात आली.

आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगावा लागला त्यांना स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणे दर्जा द्यावा. अशी मागणी वारंवार या सभागृहात करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत निर्णय घेऊ असं सांगितलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री आज तरी निर्णय जाहीर करणार का? असा सवाल एकनाथ खडसेंनी सभागृहात केला होता.

याबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की, 'आणीबाणीच्या काळात तुरुंगात गेलेल्यांना 7-8 राज्यात स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणे दर्जा आहे. त्यांना पेन्शनही मिळते. त्यामुळे राज्यातही हा निर्णय घेण्यात येणार आहे. तसा प्रस्तावही तयार आहे. पण या सगळ्यांची माहिती गोळा करायला वेळ लागत आहे. नव्या वर्षात पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल.' असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.