घाबरु नका, नववी आणि अकरावीसाठी बोर्ड परीक्षा नाही!
एबीपी माझा वेब टीम | 18 Jun 2016 12:01 PM (IST)

पुणे : नववी आणि अकरावीच्या परीक्षा बोर्डाकडून होणार नाहीत, असे स्पष्टीकरण राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले. आता ज्या पद्धतीने नववी, अकरावीच्या परीक्षा होत आहेत, त्याच पद्धतीने यापुढेही होतील, असेही ते म्हणाले. नववी, अकरावीच्या बोर्ड परीक्षा होणार असल्याची चर्चा होती, त्यानंतर तावडेंनी स्पष्ट करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राज्यात सध्या दहावी आणि बारावी या बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जात असताना, आता नववी आणि अकरावी या दोन वर्षांसाठी बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांनुसार परीक्षा घेण्याचा विचार सरकार दरबारी केला जात आहे, अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. बोर्डाच्या परीक्षेची तोंडओळख व्हावी, या हेतूने हा निर्णय घेतला जात असल्याचीही चर्चा सुरु आहे. या केवळ चर्चा असतानाही शैक्षणिक वर्तुळातून मोठ्या प्रमाणात विरोध सुरु झाला. मात्र, या नववी आणि अकरावीसाठी बोर्डाच्या प्रश्नपत्रिका नसून, या परीक्षा आधी सुरु असलेल्या पद्धतीनेच होतील, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.