कोल्हापूर : शिवसेनेशी युती करणं ही भाजपची अगतिकता असून, युती न झाल्यास काँग्रेस सत्तेत येईल, असा अंदाज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तवला. तसेच, गेल्या 4 वर्षात भाजप-शिवसेना यांनी एकही निवडणूक एकत्र लढली नसल्याचं सांगत पालघर पोटनिवडणुक उद्धव ठाकरे यांनी चुकीचं राजकारण केलं असून कटुता निर्माण केली आल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.


नरेंद्र मोदी सरकार ला 4 वर्षे पूर्ण झाल्याने विकास कामांची माहिती देण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत नरेंद्र मोदी सरकारने आजपर्यंत केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा महसूलमंत्र्यांनी या वेळी मांडला.

तसेच, “दिवंगत चिंतामण वनगा यांच्या कुटुंबातून एकास उमेदवारी देण्याचे भाजपने निश्चित केले होते. पण याबाबतची कसलीच खातरजमा न करता उद्धव ठाकरे यांनी वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा यास उचलून आणून उमेदवार जाहीर केला. शिवसेनेची ही कार्यशैली वादाला कारणीभूत ठरली आहे.”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

साखर उद्योगात निर्माण झालेल्या समस्यांबाबत केंद्र व राज्याचे प्रयत्न सुरु आहेत. साखरेचे अतिरिक्त उत्पादन, शेतकऱ्यांना एफआरपी मिळण्यातील अडचणी, साखर निर्यात, असे काही मुद्दे ऐरणीवर आले आहेत. यातील प्रत्येक घटकाला कशाप्रकारे मदत करता येईल, याचा विचार करण्यासाठी 28 मे रोजी मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आपण उपस्थित राहणार आहोत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.