राज्यभर थंडीची लाट, नाशिकनंतर मराठवाडाही गारठला
एबीपी माझा वेब टीम | 07 Nov 2016 07:53 AM (IST)
मुंबई : दिवाळीनंतर राज्यात थंडीची लाट आली असून नगर, पुणे, नाशिक शहरांसह अन्य ठिकाणी देखील बोचरी थंडी जाणवू लागली आहे. मराठवाड्यात जोमदार पाऊस झाल्याने तिथेही थंडी जाणवू लागली आहे. ऑक्टोबरच्या गरमीचा तडखा यंदा फार जाणवला नाही. मात्र थंडीने जोरदार आगमन केले आहे. दिवाळी संपल्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच तापमानाचा पारा खाली उतरला आहे. अचानक पारा घसरल्याने लोकांना चांगलीच हुडहुडी भरली असून यापुढील काही दिवस कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसपर्यंत आणि किमान तापमान 12 ते 15 अंश सेल्सिअसपर्यंत राहिल, असा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. जवळपास गेल्या आठवडाभरापासून नाशिक आणि निफाड चांगलच गारठलं आहे. त्यानंतर थंडीची लाट आता राज्यभर जाणवू लागली आहे.