Nagpur News : राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे सेना-भाजप सरकारने नागपूर महानगरपालिकेतील (NMC Elections) प्रभाग रचना पुन्हा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. प्राप्त माहितीनुसार प्रभाग चार सदस्यांचा तसेच जुनीच रचना कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे समजते. त्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) आणि शिवसेनेला (ठाकरे) (Uddhav Thackeray) सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.


यापूर्वीच्या महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादीचा एकच उमेदवार निवडून आला होता. महाविकास आघाडी सरकारने प्रभागांची रचना बदलताना सदस्यांची संख्या वाढवली होती. आघाडीने काही प्रभागाची रचना आपली राजकीय सोय बघून केली होती असा आक्षेप होता. त्यानुसार महाविकास आघाडी एकत्र लढली असती तर काँग्रेसह राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या वाढली असती तसा अंदाजही वर्तवला जात होता. मागासवर्गीय आणि मुस्लीमबहुल वस्त्या एकत्रित करण्यात आल्या होत्या. भाजपपेक्षा जास्त अनुकूल होत्या. कॉंग्रेसने केलेल्या सर्व्हेत 60 जागा जिंकू असा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे आघाडीचे उमेदवार चांगलेच उत्साहित झाले होते. मात्र राज्यात सत्ता पालट झाल्यानंतर शिंदे-भाजप सरकारने सर्वच रचना बदलवण्याचा निर्णय घेतला. नगर विकास विभागाने जुनी प्रभाग रचना रद्द करुन नव्याने करण्याचे निर्देश दिले आहेत.


ठाकरे सेनेविरोधात भाजपची 'फिल्डिंग'


नागपूरमध्ये भाजपचे (Nagpur BJP) तब्बल 108 तर काँग्रेसचे 29 नगरसेवक निवडून आले होते. त्या खालोखाल 10 बसपचे नगरसेवक होते. राष्ट्रवादीने फक्त खाते उघडले तर शिवसेनेची संख्या दोनवर थांबली होती. आता भाजप आणि शिवसेनेचे संबंध ताणले गेल्यामुळे भाजपची मदतही यावेळी शिवसेनेच्या उमेदवारांना होणार नाही. दुसरीकडे शिंदे सेना आणि मनसे सुद्धा सक्रिय झाली आहे. महापालिकेत उमेदवार उभे करण्याचा निर्णय दोन्ही पक्षाने घेतला आहे. ते शिवसेनेच्याच मतांचा वाटा खेचून घेणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या शहरातील अस्तित्वासाठी यंदाची निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. त्यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये, याची दक्षता भाजपतर्फे घेतली जाणार असल्याचे कळते.


सक्षम उमेदवारांसाठी धडपड


सध्या शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा फक्त एकच नगरसेवक आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला जागा सोडण्यास कॉंग्रेस नेत्यांची तयारी नाही. स्थानिक नेत्यांचा यास कडाडून विरोध आहे. चारच्या प्रभागात चार सक्षम उमेदवार मिळवणे राष्ट्रवादीसाठी सध्या अवघड दिसत आहे. त्यामुळे त्यांना शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांची जागा टिकवून ठेवण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे. पेठे यांच्या प्रभागातून तीन उमेदवार भाजपचे निवडून आले होते. त्यामुळे यंदा पुन्हा चार सदस्यांच्या प्रभागामुळे पेठे यांनाही चांगलेच परिश्रम घ्यावे लागणार असल्याचे चित्र आहे.


शहरातील युवक कॉंग्रेस सुस्त


राज्यात महाविकास आघाडी (MVA) सरकार असताना 'आंदोलनवाला' म्हणून कॉंग्रेसच्या (Youth Congress) राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये प्रसिद्ध असलेल्या पदाधिकाऱ्याकडून युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी किमान 15 तिकीटे मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. सुरुवातीला दोन सदस्यांचा प्रभाग होणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा असल्याने युवक कॉंग्रेसचे कार्यकर्तेही जोमाने आपल्या प्रभागात सक्रिय झाले होते. मात्र तीन सदस्यांचा प्रभाग त्यावेळी निश्चित झाल्याने अर्धे कार्यकर्ते हताश झाले होते. तसेच आता पुन्हा चार सदस्यांचा प्रभाग होणार असल्याने आपण या मोठ्या प्रभागात टिकणार का अशा संशय भावी उमेदवारांच्या मनात आल्याने युवक कॉंग्रेस सुस्त अवस्थेत आहे.


ही बातमी देखील वाचा


Arvind Kejriwal Statement: एका दिवसासाठी माझ्याकडे CBI-ED सोपवा; अर्धा भाजप तुरुंगात जाईल; केजरीवालांचा हल्लाबोल