पुनर्वसन झालेल्या माळीणची पहिल्याच पावसात बिकट अवस्था
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 25 Jun 2017 01:19 PM (IST)
पुणे : पुनर्वसन झालेल्या माळीणची पहिल्या पावसात बिकट अवस्था झाली आहे. गावातील अनेक रस्ते खचले आहेत. तर भिंतींनाही मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थ स्थलांतर करण्याच्या मनस्थितीत आहेत. पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर 30 जुलै 2014 रोजी दरड कोसळल्यानं संपूर्ण गाव मातीखाली गाडलं गेलं होतं. या दुर्घटनेनं अनेकांना सुन्न करून सोडलं होतं. साखरझोपेत असताना संपूर्ण गाव मातीखाली गेला होता. या दुर्घटनेत 151 जणांचा बळी गेला, तर काहींचे संपूर्ण कुटुंब मातीखाली गाडली गेली होती. या दुर्घटनेनंतर राज्य सरकारनं माळीण गावचं पुनर्वसन करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 2 एप्रिल रोजी माळीण गावच्या पुनर्वसनाच्या कामाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी माळीण गावातील नव्यानं बांधण्यात आलेल्या घरं, शाळा आणि मंदिरांचं बांधकामांचं लोकार्पण करण्यात आलं. पण आजच्या पहिल्याच पावसात पुनर्वसन झालेल्या माळीणची बिकट अवस्था झाल्याचं पाहायला मिळत आहे. माळीण गावातील रस्ते खचले आहेत. तर अनेक ठिकाणी भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थ स्थलांतर करण्याच्या मनस्थितीत आहेत.