मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात जी पोलीस दलातील मेगाभरती होणार आहे ती तात्काळ रद्द करावी अन्यथा आम्हांला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आत्महत्येची परवानगी द्यावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे.


सध्या प्रशासन आम्ही आंदोलन करण्याची भूमिका जरी जाहीर केली तरी आम्हांला रातोरात घरी येऊन त्रास देतं आहेत. आम्हांला नोटिसांवर नोटिसा पाठवत आहेत. त्यामुळे आमचे अधिकार जर आम्हांला मिळणार नसतील. आगामी पोलीस भरतीत जो आमच्या बांधवांना लाभ मिळणार होता. त्यापासून आम्हांला वंचित ठेवणार असतील तर आम्ही जगून तरी काय उपयोग. त्यापेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हांला आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अशी मागणीच मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी केली आहे. आज मुंबईत मराठी क्रांती मोर्चाचे समनव्यक वीरेंद्र पवार, अंकुश कदम आणि विनोद साबळे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेत विनोद साबळे यांनी ही भूमिका मांडली.


पत्रकार परिषदेत बोलताना वीरेंद्र पवार म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ पोलीस भरती रद्द करावी. जर पोलिस भरती रद्द केली नाही तर आम्हांला आत्महत्येचा पर्याय द्या. कारण सध्या आंदोलन केल तर अटक होतीय. आमच्यातील तब्बल 48 बांधवांवरील दाखल गुन्हे आद्यप शासनाने मागे घेतले गेले नाहीत. केवळ वेळोवेळी आम्हांला फसवी आश्वासनं देण्यात येतं आहेत. काही दिवसांपूर्वी आमच्या आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने स्टे दिला. त्याच दिवशी तत्परतेने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एफवायचे प्रवेश स्थगितीत करण्याचा दिला. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतर केवळ दीड तासात परिपत्रक काढून प्रवेश प्रक्रियेसाठी निर्णय लागू करण्यात आला. जर त्यांनी तात्काळ आदेश दिले नसते तर आम्हांला कोर्टात शैक्षणिक प्रवेशाच्या अनुषंगाने बोलता आलं असतं. परंतु जाणूनबुजून हे करण्यात आलं. सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी काही लोक काम करत आहेत. सध्या केवळ केंद्र आणि राज्य सरकारच्या वादात मराठा समाजाला भरडण्याचा प्रयत्न सत्ताधारी आणि विरोधक करत आहेत. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, दोन दिवस थांबा आम्ही निर्णय घेऊ परंतु आमचा निर्णय कोर्टात आहे मग मुख्यमंत्री काय निर्णय घेणार आहेत? हे आम्हाला अद्याप कळलेलं नाही.