रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील आंबोळगड येथील आय लॉग बंदराला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. आंबोळगडमध्ये होणाऱ्या आय लॉग बंदराचा मुद्दा मागील तीन ते चार वर्षापासून चर्चेत आहे. स्थानिकांनी याला विरोध केला होता. हा प्रकल्प रद्द व्हावा याकरता आंदोलनाची हाक देखील देण्यात आली होती. त्याकरता 6 फेब्रुवारी रोजी राजापुरातील तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देखील देण्यात आला होता. पण, आता तात्पुरती स्थिगिती देण्यात आल्यानं हा मोर्चा देखील रद्द करण्यात आला आहे.


आंबोळगड किनारा हा निसर्ग सौदर्यानं नटलेला असून जैवविविधतेच्या मुद्यावर प्रकल्पाला विरोध करण्यात आला होता. दरम्यान, तज्ज्ञांशी चर्चा आणि अभ्यासाअंती अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. शिवाय, गरज पडल्यास आंबोळगडला भेट देणार असल्याचं आश्वासन या बैठकीत आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे.

काय आहे जैवविविधतेचा अहवाल?
आंबोळगड हा किनारा बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन प्लान फॉर जैतपूर रीजन(Biodiversity Conservation Plan for Jaitapur Regeion) या बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीनं केंद्रीय पर्यावरण खात्यासाठी केलेल्या अभ्यासात कन्झर्वेशन प्रायोरीटी इन्डेक्सवर (Conservation Priority Index) अतुच्च असून या किनाऱ्याचे संरक्षण केले पाहिजे असं नमुद केलं आहे. शिवाय, हा अहवाल केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं स्वीकारला आहे.

नाणार, जैतापूरनंतर आंबोळगड
रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात नाणार, जैतापूर प्रकल्पानंतर आंबोळगड प्रकल्पाला विरोध कायम आहे. कोकणात पर्यावरणपूरक प्रकल्प आणा अशी मागणी केली जातेय. आंबोळगड हा प्रकल्प नाणारपासून 20 किमी आणि जैतापूरपासून 5 किमी अंतरावर आहे. दरम्यान, या प्रकल्पाला तात्पुरता स्थगिती देण्यात आल्यानं आदित्य ठाकरे काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे.
VIDEO | नाणार रिफायनरीचा मुक्काम रत्नागिरीतून रायगडमध्ये? | स्पेशल रिपोर्ट | रायगड | एबीपी माझा