संगमनेर तालुक्यातील घारगाव जवळील अकलापूर या गावात स्वयंभू असलेले एकमुखी दत्त देवाच मंदिर आहे. राज्यभरातील अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात.
2003 साली ग्रामस्थांनी एकत्र येत या मंदिराचा जीर्णोद्धार करीत गावातून सोने गोळा केले आणि 51 तोळे वजनाचा सोन्याचा कळस मंदिरावर बसवला. यावेळी अनेक महिलांनी आपल्या गळ्यातील मनी मंगळसूत्र कळसासाठी दिले असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष भिकाजी भैय्या यांनी दिली.
दरम्यान, काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कळसावर चढत पूर्ण कळस चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पूर्ण कळस निघत नसल्यान चोरट्यांनी कळसाचा वरील भाग कापत तब्बल 20 ते 25 तोळे वजनाचा भाग चोरून नेला असल्याची माहिती फिर्यादी आणि ट्रस्टचे उपाध्यक्ष दतात्रय आभाळे यांनी दिली.
आज सकाळी ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत पंचनामा केला असून चोरट्यांनी या चोरीत वापरलेले दोरी व इतर साहित्य हस्तगत केले. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. तपासासाठी पथके पाठविण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अजय देवरे यांनी दिली.
दरम्यान, यापूर्वीही या मंदिरात तीन वेळा चोरी झाली असून एकदा मंदिराचा कळस चोरण्याचा डाव फसला आहे. यापूर्वीच्या घटनामध्ये जेवल एका चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले असून, आता या चोरीचा तपास लवकर लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.