Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Chnage) होत आहे. सध्या अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) जोर पाहायला मिळत आहे. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, 18 तारखेपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यानंतर म्हणजे 19 मे पासून राज्यात अतितीव्र उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता हवामान अभ्यासक विजय जायभावे यांनी वर्तवला आहे. तर काही भागात रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.


हळूहळू तापमानात वाढ होणार


राज्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर पुढील एका आठवड्यात अतितीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 19 मे पासून हळूहळू तापमानात वाढ होणार आहे. तर 20, 21 आणि 22 मे पासून राज्यातील काही भागात तापमान 45 अंश ते 46 अंश अश्या रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद होण्याची शक्यता विजय जायभावे यांनी वर्तवली आहे.  तर अनेक भागात तापमान हे 43 अंश ते 44 अंश राहणार आहे. 


पुढील तीन ते चार दिवस या भागात पावसाची शक्यता


पुढील तीन ते चार दिवस दक्षिण महाराष्ट्र, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेडमध्ये जोरदार मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तसेच नाशिक, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर या भागात स्थानिक वळीव पाऊस होण्याची शक्यता असल्याची माहिती विजय जायभावे यांनी दिली.


एल निनोचा प्रभाव कमी


सध्या एल निनो कमी होत असून, 15 मे पर्यंत पूर्ण प्रभाव कमी होईल. हिंदी महासागरावर मात्र मे महिन्यात iod (इंडियन ओशन डायपोल ) पॉझिटिव्ह परिस्थितीमध्ये येणार आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात आणि देशात मान्सून पूर्व (वळिव) पावसाचे प्रमाण मे महिन्याच्या शेवटी आणि जून महिन्याच्या सुरवातीला जास्त राहील अशी माहिती विजय जायभावे यांनी दिली आहे.  


कोणत्या भागात कसं असेल तापमान?


उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, संभाजीनगर, अहमदनगर काही भागात पुढील दोन ते तीन दिवस गडगडाटी वादळी पाऊस अधून मधून होईल. मात्र 17 मे ते 25 मे पर्यंत या भागात अधिक तापमान वाढ होईल. तसेच कोकण सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी  ठाणे मुंबई पालघर काही भागात तीन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात 15 मे नंतर पुढील दोन ते तीन दिवस पुणे अहमदनगर दक्षिण सातारा कोल्हापूर सोलापूर सांगली स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस होईल दिवसाचे तापमान जास्त राहिल. मराठवाड्यात 15 मे पासून लातूर नांदेड हिंगोली  बीड धराशिव  दक्षिणेत जोरदार पाऊस होईल जालना बीड परभणी या  भागात स्थानिक  वळिव पाऊस होईल. 16 मे पासून ते 24  मे अनेक भागात तीव्र उष्णतेची लाट राहील. 


पुढील आठवडाभार विदर्भात तीव्र तापमान वाढणार


विदर्भात पुढील एक आठवडा नागपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, वाशीम, बुलढाणा, अकोल्यात तीव्र तापमान वाढ कायम राहील. तर किरकोळ ठिकाणी मेघगर्जेनेसह पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय.


महत्वाच्या बातम्या:


सावधान! आजही राज्यात वीज वारा गारांसह पाऊस पडणार, मुंबईसह 'या' भागात इशारा