मुंबई : मुंबईकरांना रविवारपासून उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. मुंबईत काल (रविवारी) 31.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. मुंबईसह महाराष्ट्रात उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी उन्हात फिरताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.


मुंबईतील कुलाब्यात रविवारी 30.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. सांताक्रुझमध्ये 60 टक्के, तर कुलाब्यात 80 टक्के आर्द्रता नोंदवण्यात आली. उन्हाच्या चटक्यांसह काही ठिकाणी मुंबईकर घामाच्या धारांमध्येही भिजत आहेत.

विदर्भ आणि मराठवाड्यात पारा 37 ते 41 अंशांदरम्यान राहिला. विदर्भात वर्धा आणि अमरावतीत 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर मध्य महाराष्ट्रात पारा 39 अंशांवर पोहचला आहे.

राज्यामध्ये पारा चढला असला तरी 21 मार्चपर्यंत उष्णतेची लहर राज्यात नसल्याचं हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.