मुंबई : राज्यातील बारावीच्या परीक्षेच्या पेपर तपासणीवर शिक्षकांनी टाकलेला बहिष्कार अखेर मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे बारावीच्या परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर बहिष्कार मागे घेण्यात आला.


बारावीच्या पेपर तपासणीच्या कामाला आजपासून सुरुवात केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता. मात्र मागण्यांबाबत शासकीय आदेश दिल्यामुळे या क्षणापासून आंदोलन मागे घेत असल्याचं शिक्षक महासंघाने जाहीर केलं.

बारावीच्या पेपर तपासणीवर शिक्षक संघटनेचा बहिष्कार


शिक्षणमंत्री दाद देत नसल्यास मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली जात होती. त्यामुळे बारावीच्या परीक्षांचा निकाल लांबण्याची शक्यता निर्माण झाली होती. बारावीच्या विविध विषयांच्या तब्बल 80 लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून होत्या.

शिक्षकांनी एकही उत्तरपत्रिका तपासण्यास सुरुवात केली नव्हती. नियमानुसार पाच जूनपूर्वी बारावीचा निकाल लावणं आवश्यक आहे.