मुंबई/गडचिरोली : राज्यभरातील बहुतांश शाळा आज बंद आहेत. कारण 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना त्याआधीची पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी शिक्षकांनी संप पुकारला आहे. मुंबईतल्या आझाद मैदानावर शिक्षकांचं आंदोलन सुरु आहे. या संपामुळे राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा, अनुदानित खासगी शाळा, विनाअनुदानित खासगी शाळा बंद राहणार आहेत. या संपाला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, शिक्षक भारतीने पाठिंबा दिला आहे.

चंद्रपुरातील सर्व शाळा बंद
राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी आज राज्यातील शिक्षकांनी संप पुकारला आहे. शिक्षकांच्या या संपाचा चंद्रपूर जिल्ह्यात मोठा प्रभाव दिसून आला असून जिल्ह्यातील सर्वच शाळा बंद आहेत. जुन्या पैशांच्या मागणीसाठी जिल्ह्यातील जवळपास 5 हजार शिक्षक आणि कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. संपकरी शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर एक मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.


मुंबईत संपात फूट
दरम्यान ग्रामीण भागात शिक्षकांच्या संपाला मोठा प्रतिसाद मिळत असला तरी मुंबईतील काही संघटनांनी संपाला पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे संपात फूट पडल्याचं चित्र आहे. मुंबईत एकदिवसीय काम बंद आंदोलन करणार नसल्याचं शिक्षक संघटनांनी म्हटलं असून काही शासकीय कर्मचारी संघटनाही कामावर हजर आहेत.

2005 नंतर सेवेमध्ये रुजू झालेल्या शिक्षकांना यापूर्वीची पेन्शन लागू होणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिक्षकांसह सर्व शासकीय कर्मचारी एकवटले आहेत. सोमवारी (9 सप्टेंबर) सकाळी जिल्ह्यातील शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आलं होतं. त्यानंतर काही वेळात शासकीय कार्यालयं बंद करण्यात आली. मात्र, खासगी शाळा ह्या नेहमीप्रमाणे सुरू झाल्या होत्या. या ठिकाणीही शिक्षक संघटना दाखल झाल्या आणि शाळा बंद करण्याचे आवाहन केलं.

शिक्षकांच्या मागण्या
नोव्हेंबरनंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, केंद्राप्रमाणे सातव्या वेतन आयोगातील सर्व भत्ते लागू करावेत, कंत्राटी धोरण रद्द करुन या कर्मचाऱ्यांना कायम करावे, यासारख्या दहा मागण्या मांडण्यात आल्या. आज मंत्रिमंडळाची बैठक असून याच बैठकीत हा निर्णय व्हावा अन्यथा पुन्हा आचारसंहितेचा अडसर निर्माण होईल, अशी या शिक्षकांची भावना आहे.