Anil Parab : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळं गेल्या दोन वर्षांनंतर यावर्षी आषाढी एकदशीनिमित्त वारी सोहोळा होत आहे. वारीसाठी राज्यभरातून असंख्य पालख्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होत असतात.  यंदा लाखोंच्या संख्येनं येणाऱ्या वारकऱ्यांची, भक्तांची संख्या पाहता त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या, त्यासाठी पंढरपूर येथे आरोग्य शिबिर आयोजित करा, त्यांना पिण्यासाठी नाममात्र दरात स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्या, असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, यात्रेदरम्यान महामंडळानं वारकऱ्यांसाठी  केलेल्या सोयी-सुविधांची आपण स्वत: पाहणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.


वारीसाठी 4 हजार 700 गाड्या सोडणार


पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी 4 हजार 700 गाड्या सोडणार असल्याचं घोषित केलं. पंढरपूर यात्रेदरम्यान एसटीच्या प्रवासी वाहतुकीला अनन्य साधारण महत्व असते. त्यामुळं वारकरी, भाविक तसेच प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूरपर्यंत घेऊन जाणं त्याचबरोबर श्री विठुरायाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना सुखरुप घरी सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असते. यंदा यात्रेसाठी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंत्री परब यांनी मंत्रालयातील दालनात एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह विविध विभागांचे महाव्यवस्थापक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


पंढरपूर येथे आरोग्य शिबिर आयोजीत करावं


वारकरी तसेच सर्वसामान्य नागरीक हे एसटीचे खरे प्रवासी दैवत आहेत. त्यामुळं पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांची तसेच नागरीकांची काळजी घेणं आपलं काम आहे. भरपावसात लाखोंच्या संख्येनं वारकरी पंढरपूर येथे पालख्यांसोबत चालत येतात, त्यांच्या सेवेसाठी एसटीनेही हातभार लावत, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी  पंढरपूर येथे आरोग्य शिबिर आयोजीत करावं, अशी सूचनाही त्यांनी केली. पंढरपूर येथे तात्पूरत्या स्वरुपात उभारण्यात येणाऱ्या चार एसटी स्थानकांवर हे शिबिर आयोजित करावे, असे निर्देश परब यांनी दिले आहेत.  यात्रेदरम्यान इंधनाचा आवश्यक साठा करुन ठेवावा. प्रवासादरम्यान बस बंद पडल्यास पर्यायी बसेसची व्यवस्था करावी. तसेच वारकऱ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी चालकांना वेगावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना द्याव्यात, असे निर्देशही यावेळी मंत्री, ॲड. अनिल परब यांनी दिले.


ग्रुप आरक्षणाला प्राधान्य


आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी राज्यभरातील असंख्य गावातून लाखोंच्या संख्येने नागरीक पंढरपूरकडे रवाना होत असतात. मात्र, अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी महामंडळाने ग्रुप आरक्षणाला प्राधान्य द्यावे, असे निर्देश परब यांनी दिले. नागरीकांनी ग्रुप बुकिंग केले तर त्यांना गावच्या ठिकापासून ते पंढरपूर येथील विठूरायाच्या दर्शनानंतर त्यांना थेट त्यांच्या गावात सोडण्याची व्यवस्था केली जाईल, असेही मंत्री ॲड. परब म्हणाले.


महत्वाच्या बातम्या: