सांगली : ऊस दराच्या तिढ्यावरून सांगली जिल्ह्यात ऊस आंदोलन जोर घेत आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यातील नाद्रे गावात काल मध्यरात्री उस वाहतूक करणाऱ्या तब्बल 25 गाड्या रोखल्या गेल्या. सांगलीच्या दत्त इंडिया कारखान्याला ही ऊस वाहतूक होत होती. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्रीच यातील 25 उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर रोखले. यावेळी घटनास्थळी पोलीस आणि शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमले होते.


त्यानंतर पोलिसांनी हे सर्व ट्रॅक्टर पोलीस संरक्षणात दत्त इंडिया कारखान्यात सोडले. दरम्यान आज सांगली मध्ये कारखाने बंद करण्यासाठी शेतकरी संघटना काढणार रॅली देखील काढणार आहे. शेतकऱ्यांची थकीत बिले द्यावीत, एफआरपी प्रमाणे दर द्यावा आणि मगच ऊस कारखाने सुरू करावेत, अशी स्वाभिमानीची मागणी आहे.

एकीकडे शेजारील कोल्हापूर जिल्ह्यात संपूर्ण कारखाने हे बंद असताना सांगलीत मात्र ऊसतोड आणि कारखाने सुरू केले गेले आहेत. जोपर्यंत ऊसदर ठरत नाही तोवर कारखाने सुरू करणे हा कायद्याने गुन्हा असून देखील कारखानदार हा गुन्हा करत असल्याचा स्वाभिमानीचा आरोप आहे.  काल वाळवा तालुक्यात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विश्वास सहकारी साखर कारखान्याला जाणारी ऊस वाहतूक थाबंवली होती.

मागील आठवड्यात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गांधीगिरी करत शिराळा तालुक्यातील ऊस तोडणी आणि वाहतूक रोखली होती. उसाच्या फडात जाऊन ऊस तोडणी करणाऱ्या आणि ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर रोखून त्याच्या गळयात पुष्पहार घालून यावेळी आंदोलन करण्यात आले होते. तर काही ठिकाणी संघटनेने गनिमी काव्याने आंदोलन करत ऊस वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरची हवा सोडून वाहतूक रोखली होती.

साडेनऊ टक्के रिकव्हरी बेस वर एफआरपी अधिक 200 रुपये दर देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आले आहे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगली जिल्ह्यात आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत दर जाहीर होत नाही तोपर्यंत कारखाने सुरू होऊ देणार नाही अशी भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली आहे. जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊसतोड रोखण्यात येत आहे.