राज्यातील सर्व टोलनाक्यांवर 11 नोव्हेंबरपर्यंत टोलवसुली बंद
एबीपी माझा वेब टीम | 09 Nov 2016 05:20 PM (IST)
मुंबई : एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर अनेक नागरिकांनी दैनंदिन व्यवहारात अडचणी येत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यामुळे राज्यातल्या सर्व टोलनाक्यांवरील टोलवसुली 11 नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच पुढील दोन दिवस बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या अंतर्गत असलेले सर्व टोलनाक्यांवर 11 तारखेपर्यंत टोलवसुली बंद राहणार आहे. सामान्य वाहनचालकांच्या दृष्टीने राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोलवसुली 11 नोव्हेंबरपर्यंत थांबवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्यानेही ही घोषणा केली आहे. https://twitter.com/nitin_gadkari/status/796304081786585088 बँक आणि पोस्ट ऑफिस तुमचं खातं असलेल्या कोणत्याही बँकेत, कोणत्याही शाखेत 30 डिसेंबरपर्यंत दिवसाला 4 हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून घेता येतील. पण त्यासाठी रिझर्व्ह बँकेने जारी केलेला फॉर्म भरून द्यावा लागेल. केवळ पैसे बदलण्यासाठीच हा फॉर्म भरावा लागेल. तुमच्या खात्यात पैसे भरायचे असतील, तर या फॉर्मची गरज नाही. पैसे बदलण्यासाठी पॅन कार्ड आणि आधारकार्ड किंवा मान्यताप्राप्त ओळखपत्र सोबत असणं आवश्यक आहे. समजा तुमच्याकडे 500 रुपयाच्या 20 नोटा म्हणजे 10 हजार रुपये असतील, तर त्यापैकी 4000 रुपयेच एका दिवसात बदलून मिळतील. म्हणजे तुमच्याकडच्या 500 रुपयाच्या 8 नोटाच बँकेत/पोस्टातून एका दिवसात बदलून घेता येऊ शकतील. परत दुसऱ्या दिवशी हीच प्रक्रिया असेल. पण तुम्ही तुमच्या खात्यावर कितीही रक्कम भरू शकता. केवळ बदलून घेण्यासाठीच 4 हजार रुपयांची ही मर्यादा असेल. 10 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबरपर्यंत दिवसाला 4 हजार रुपये तुम्ही बदलून घेऊ शकता. त्यानंतर यामध्ये वाढ होईल. पैसे बदलण्यासाठी मर्यादा, मात्र अकाऊंटमध्ये भरण्याला नाही बँकेतून पैसे बदलून घेण्यासाठी मर्यादा आहेत, मात्र तुमच्याकडे 500 किंवा हजार रुपयाच्या कितीही नोटा असतील, तर त्या डिपॉझिट करण्यासाठी किंवा खात्यावर भरण्यासाठी मर्यादा नाही. त्यामुळे तुमच्याकडील सर्व पैसे तुमच्या खात्यावर भरल्यास काहीही अडचण नाही. खात्यावरुन किती पैसे काढू शकाल? तुम्ही तुमच्या खात्यावरील दिवसाला 10 हजार रुपये आणि आठवड्याला 20 हजारपर्यंतची रक्कम काढू शकाल. समजा तुम्ही उद्या 8 हजार रुपये काढले, तर तुम्हाला आठवडाभरात 12 हजार रुपयेच काढता येतील. पण प्रत्येकवेळी तुम्हाला दहा हजारची मर्यादा असेल. (त्यामुळे 12 हजार काढायचे असतील तर दहा हजार निघतील, त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन हजार काढावे लागतील) त्यानंतर पुढच्या आठवड्यात पुन्हा 20 हजार रुपये काढता येतील. ही मर्यादा नोटांचा पुरेसा साठा उपलब्ध होईपर्यंत असेल. त्यानंतर कोणतीही मर्यादा नसेल. प्रत्येक एटीएमवरुन दिवसाला 2 हजार रुपयांची मर्यादा तुमच्या अकाऊंटवर कितीही रुपये असले तरी एटीएमवरुन तुम्ही दिवसाला एका कार्डवरुन 2 हजार रुपयेच काढू शकाल. 18 नोव्हेंबरपर्यंत ही मर्यादा असेल. त्यानंतर ही मर्यादा 4 हजारपर्यंत वाढवण्यात येईल. ही मर्यादा नोटांचा पुरेसा साठा उपलब्ध होईपर्यंत असेल. त्यानंतर कोणतीही मर्यादा नसेल.