नागपूर : आर्थिकदृष्ट्या सक्षम असताना आरक्षण मागणं ही लाचारी असे वक्तव्य देशाचे माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार यांनी केलं. नागपुरात ज्येष्ठ नाटककार दत्ता भगत यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.


आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यानंतर, स्वत:हून आरक्षण सोडल्याची आठवणही त्यांनी सांगितली. “काही लोक आधीच्या पिढीवर झालेल्या अन्यायाचं भांडवल करतात. हे थांबलं पाहिजे,” असं आवाहनही त्यांनी केलं.

ते म्हणाले की, “मी जेव्हा नोकरी करत होतो. त्यावेळी मी मागासवर्गीय प्रवर्गातील शिष्यवृत्ती घेतली. कारण, त्या काळात 60 रुपये पगारात दोन आयांना सांभाळणं शक्य नव्हतं. पण जेव्हा मी सधन झालो. मंत्री झालो. त्यावेळी माझ्या मुलीने हिच शिष्यवृत्ती न घेण्याचा निर्णय घेतला."

"सधन असतानाही अशी शिष्यवृत्ती घेणं ही एकप्रकारची लाचारी आहे, असं मला वाटतं” असं परखड मत त्यांनी यावेळी मांडलं.

तसंच ज्या व्यवसायामुळे जात कळणार असेल, तो व्यवसायही सोडण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आज असे जे करतात. त्यांबद्दल आपल्याला आनंद वाटत असल्याची भावानाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.