Bullock Cart Race :  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बैलगाडा राज्यात मालकांनी जल्लोष केला आहे. बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवण्यासाठी विधानसभेपासून लोकसभेपर्यंत मागणी होत होती. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं. आता बंदी उठल्यानं चांद्यापासून बांद्यापर्यंत जल्लोष साजरा केला जातोय.  विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात आज जणू दिवाळी-दसराच आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कुठे हलगीचा नाद ऐकायला मिळाला तर कुठे गुलालाची उधळण सुरू आहे. कुठे फटाके वाजवले जात आहेत. तर कुठे पेढे वाटून तोंड गोड केलं जातंय.


सांगली


बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिल्यानंतर सांगलीच्या कसबे डिगजमध्ये शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. बैलावर गुलालाची उधळण करत, फटाके फोडत बैलगाडा शर्यत सुरु झाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.


पुणे


दरम्यान पुण्याच्या खेडमध्येही बैलगाडा मालकांनी निकालानंतर जल्लोष साजरा केला आहे. बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी मिळाली आहे. त्या सर्व नियम आणि अटी पाळतच शर्यती पार पाडू, असा विश्वास बैलगाडा चालक-मालकांनी जल्लोष करताना व्यक्त केला. फटाके फोडत, भंडारा उधळत, एकमेकांना पेढे भरवत या निर्णयाचे स्वागत त्यांनी केले.


बारामती 


सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिल्यानंतर सर्व स्तरातून या निर्णयाचे स्वागत होतंय. बारामतीतही या निर्णयाचं बैलगाडा मालकांनी स्वागत करत आनंद साजरा केलाय. डोर्लेवाडी गावात गुलालाची उधळण, फटाक्‍यांची आतषबाजी करत बैलगाडा मालकांनी  सरकारचे आभार मानले आहेत. 


नारायणगाव


नारायणगावात सर्वपक्षीय नेत्यांणी बैलगाडा शर्यत सुरू झाल्यामुळे मोठा जल्लोष केला आहे. 


सुप्रीम कोर्टानं महत्वाचा निर्णय देत बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली आहे. राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळं राज्यातील बैलगाडा मालकांना दिलासा मिळाला आहे.  बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर काल (बुधवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली होती. त्याआधीच्या सुनावणीवेळी याबाबत इतर राज्यांना नोटीस बजावण्यात आली होती. तसेच त्यांना उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. 2017 साली मुंबई हायकोर्टानं बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. याला राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. आता या शर्यतींना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. सात वर्षांनंतर या निर्णयामुळं बैलगाडा शर्यत पुन्हा राज्यात सुरु होणार आहे.


 



महत्त्वाच्या इतर बातम्या :