चंद्रपूर : बलात्कारामुळे व्यथित झालेल्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. नागभीड पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कसर्ला येथील मन हेलावून टाकणारी ही घटना आहे. विशेष म्हणजे मृत मुलीने याबाबत एक सुसाईड नोट लिहून ठेवल्याने या सर्व घटनाक्रमाचा आणि आरोपींचा तातडीने उलगडा झाला आहे. शुक्रवारी मृतक मुलीची आई गावातीलच अन्य एका शेतावर मजुरीला गेली होती.


पीडित मुलगी दुपारच्या सुमारास आपल्या स्वतःच्या शेतावर पिकांना पाणी देण्यासाठी शेताकडे निघाली. मात्र याच वेळी आरोपी मंगेश दिवाकर मगरे (27) व अजय मुरलीधर नन्नावरे (20) यांनी तिचा पाठलाग केला. शेतावर गेल्यावर तिच्यावर दोघांनी बळजबरीने अत्याचार केला. हे कृत्य सहन न झाल्यामुळे पीडित मुलीने स्वतःच्या शेतात एका कागदावर घडलेला सर्व प्रकार चिठ्ठीत लिहून ठेवला व शेतालगतच्या कुशाब बारेकर यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली .

सायंकाळी आई घरी आल्यावर मुलगी घरी व गावात कुठेही दिसत नाही म्हणून रात्री शेतावर शोध घेतला. तेव्हा शेताच्या पाळीवर एका ठिकाणी पावड्याखाली मुलीने लिहिलेली चिठ्ठी मिळाली. चिठ्ठीवरून मुलीने काहीतरी बरेवाईट केल्याचा संशय आल्याने जवळच्या विहिरीत गळ टाकून शोध घेण्यात आला. विहिरीत शोध घेतला असता पीडित मुलीचा मृतदेह हाती लागला. दरम्यान घटनेची माहिती पोलीसांना दिल्यावर चिठ्ठीत नमूद दोन युवकांविरूद्ध नागभीड पोलिस स्टेशनला तक्रार करण्यात आली.

पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. नागभीड पोलिस स्टेशनमध्ये आरोपींवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच चंद्रपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी नागभीड गाठून तपासावर लक्ष ठेवले आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ आणि संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. एकटी मुलगी सुरक्षित राहूच शकत नाही का? अशा मोकाट नराधमांच्या भीतीमुळे मुली स्वतःचं अवकाश तयारच करू शकत नाही का? असे अनेक प्रश्न पुन्हा एकदा विचारण्याची वेळ आली आहे.