जीएसटीमुळं मुंबईतील जकात नाकेही हद्दपार
एबीपी माझा वेब टीम | 01 Jul 2017 08:37 AM (IST)
मुंबई: देशात जीएसटी लागू झाल्यानंतर आजपासून जकात नाक्यांवरची वसुली बंद झाली आहे. वाशी, ऐरोली, पनवेल, मुलुंड आणि दहिसर या मुंबईच्या एंट्री पॉईंटवरील सर्वच जकात नाके बंद झाले आहेत. या जकात नाक्यांच्या माध्यमातून महापालिकांच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा होत होता. पण, आता जीएसटी लागू झाल्यानं महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्वपूर्ण स्त्रोत बंद झाला आहे. दरम्यान, मध्यरात्रीपासून देशात एक देश एक कर लागू झाला. संसदेतील कार्यक्रमात मध्यरात्री 12 वाजता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान मोदीच्या हस्ते जीएसटी लाँच करण्यात आला. देश आर्थिक सुधारणांच्या नव्या मार्गावर वाटचाल करेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये दिली. यावेळी इतर पक्षांचे दिग्गज नेतेही सेंट्रल हॉलमध्ये उपस्थित होते. काँग्रेसनं मात्र या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. जीएसटी म्हणजे ‘गुड अँड सिम्पल टॅक्स’ : मोदी जीएसटी म्हणजे गुड अँड सिम्पल टॅक्स आहे, असं मोदींनी सांगितलं. जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था एका सूत्रात बांधली जाईल, असं मोदींनी सांगितलं. शिवाय ज्याप्रमाणे चष्म्याचा नंबर वाढल्यावर तो बदलताना जितका त्रास होतो, त्याचप्रमाणे ही नवी करप्रणाली अंमलात आल्यानंतर ती आत्मसात करण्यासाठी थोडाकाळ त्रास सहन करावा लागेल, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.