Sangli News : स्वर्गीय पतंगराव कदम (Patangrao Kadam) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आणि स्मारकाचा लोकार्पण सोहळा थोड्याच वेळामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थित होणार आहे. त्यानंतर राहुल गांधी मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवार यांची मोठी जंगी सभा देखील पार पडणार आहे. एक प्रकारे आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ राहुल गांधी सांगलीच्या (Sangli) सभेतून फोडणार आहेत. यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहत असताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे अनुपस्थित राहणार आहेत. मात्र, या सभेला ठाकरे गटाचे दुसरे कोणी पदाधिकारी उपस्थित राहणार का? याकडे सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे.


उद्धव ठाकरे का राहणार अनुपस्थित?


स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि स्मारकाचे लोकार्पण सोहळा आज पार पडणार आहे. त्यामुळे हा व्यक्तिगत कार्यक्रम आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना मी व्यक्तीशा जाऊन निमंत्रण दिलेलं होतं. जवळपास अर्धा तास त्यांच्याशी गप्पाही मारल्या. मात्र काही घरगुती कारणास्तव ते येऊ शकणार नाही असं त्यांनी सांगितल्याची माहिती काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी दिली आहे. त्यामुळं त्यांचं नाव पत्रिकेत नसल्याचे कदम म्हणाले. लोकसभा निवडणुकीनंतर आमच्यात कुठलाही वाद झालेला नाही. आम्ही अनेकदा भेटून व्यवस्थित तेही माझ्याशी बोललेले आहेत असं विश्वजीत कदम म्हणाले. दरम्यान, आज सांगलीत काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार असल्यानं मविआचं मोठं शक्तीप्रदर्शन देखील होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी सांगलीत या कार्यक्रमातून वातावरण निर्मिती करणार असल्याचं देखील बोललं जात आहे.


राहुल गांधींसह मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवार कार्यक्रमासाठी येणे हे माझ्यासाठी मोठी गोष्ट


सांगलीचा वाघ या संदर्भात मी आता बोलणार नाही. मात्र, दोन ते अडीच लाखांहून अधिक लोक येतील आणि त्यावेळी लोकच काय आहे ते ठरवतील, असे विश्वजीत कदम म्हणाले. प्रचाराचा नारळ फोडला असं म्हणता येणार नाही. कारण हा व्यक्तिगत कार्यक्रम आहे. मात्र, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवार या कार्यक्रमासाठी येणे हे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट असल्याचे विश्वजीत कदम म्हणाले.


राहुल गांधी आता दिल्लीवरुन रवाना


राहुल गांधी हे दिल्लीवरून रवाना झाले आहेत. साडेदहा वाजेपर्यंत ते नांदेडला लँड होतील. नांदेड वरून ते कोल्हापूर विमानतळावर येतील.कोल्हापूर विमानतळावरून ते हेलिकॉप्टरने वांगी कडेगाव गावामध्ये पोहोचतील. याठिकाणी पुतळा आणि सामारकाच लोकार्पण सोहळा झाल्यानंतर ते तडसर या गावी सभेसाठी रवाना होतील. 12.45  वाजता सभेला सुरुवात होईल. राहुल गांधी यांनी या सभेसाठी 1 तास 45 मिनिटांचा वेळ दिला आहे. त्यानंतर राहुल गांधी कोल्हापूर वरून पुन्हा दिल्लीला रवाना होतील.


महत्वाच्या बातम्या:


राहुल गांधी शरद पवारांसह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते 5 सप्टेंबरला सांगलीत, पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार