अहमदनगर : राज्यातील पहिल्या ग्रामरक्षक दलाची स्थापना अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी गावातून करण्यात आली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत ग्रामरक्षकांची नियुक्ती करण्यात आली.


राळेगणला नऊ ग्रामरक्षकांची निवड करण्यात आली. ग्रामरक्षक दलाच्या सदस्यातून अध्यक्ष आणि सचिवांची निवड होणार आहे. राळेगणमध्ये 15 जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या नवनियुक्त सदस्यांना ओळखपत्र दिलं जाईल.

ग्रामरक्षक दलाने गावातील व्यसनाधीनतेला आळा घालण्यास मदत होणार असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. सदस्यांच्या तक्रारीनंतर प्रशासनाने विलंब केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर तिसऱ्यांदा गुन्हा केल्यास तीन वर्ष तडीपार करण्यात येणार आहे. हा ग्रामरक्षक दल सर्वांना आदर्श असून छत्तीसगड आणि मध्यप्रदेशचा मसुदा मुख्यमंत्र्यांनी मागितल्याचं अण्णांनी सांगितलं.

दरम्यान शेतकऱ्यांच्या अहिंसक संपाला राळेगणसिद्धीचा पाठिंबा असल्याचा ठराव यावेळी गावात मंजूर करण्यात आला. त्यासोबतच अण्णांवर टीका करणाऱ्यांच्या जाहीर निषेधाचा ठरावही मंजूर करण्यात आला.

ग्रामरक्षक दलाचे सदस्य

  1. हिराबाई नवले

  2. कौशल्या हजारे

  3. शकुंतला औटी

  4. राणी पठारे

  5. रतन पोटे

  6. बाळासाहेब पठारे

  7. सुरेश पठारे

  8. संदीप पठारे

  9. भिमराव पोटे