मुंबई : राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप मागे घेण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने आणि मार्ड संघटनेचे प्रतिनिधी यांच्यात बुधवारी (7 ऑगस्ट) रात्री उशिरापर्यंत निवासी डॉक्टरांच्या मागण्यासंदर्भात बैठक पार पडली. सरकारने मागण्या मान्य करण्याचं मान्य केल्याने संप मागे घेण्यात आला. विद्यावेतन आणि इतर मागण्यांसाठी राज्यभरातील सरकारी तसंच महापालिका रुग्णालयांमधील सुमारे 4 हजार 500 निवासी डॉक्टरांनी 7 ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारला होता.


"मागील चार महिन्यांपासून राज्यातील सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना विद्यावेतन मिळालेलं नाही. तसंच मागील दीड वर्षापासून कायमच विद्यावेतनासाठी मार्डच्या डॉक्टरांना आंदोलन करावं लागत आहे. विशेष म्हणजे आंदोलन केले की एखाद्या महिन्याचे विद्यावेतन मिळते, मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे अशीच होते. त्यामुळे चारही महिन्यांचे विद्यावेतन मिळत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही", अशी भूमिका मार्डच्या डॉक्टरांनी घेतली होती.

परंतु राज्यातील पूरस्थिती आणि आजारांचा प्रादुर्भाव पाहता हा संप मागे घेतल्याचं मार्डच्या प्रतिनिधींनी सांगितलं. मात्र सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाही तर 31ऑगस्ट रोजी पुन्हा संप पुकारण्यात येईल, असा इशाराही मार्डने दिला आहे.

बैठकीत मान्य झालेल्या मागण्या
 
- नागपूर, लातूर, अकोला आणि अंबाजोगाई इथल्या निवासी डॉक्टरांचे थकलेले विद्यावेतन लवकरात लवकर देणार

- टीबी झालेल्या डॉक्टरांच्या सुट्टीची मागणी आणि प्रसुती रजा मान्य

- येत्या 15 दिवसात कॅबिनेट मीटिंगमध्ये विद्यावेतनवाढीच्या मागणी मांडणार

- पाच हजार रुपयांनी वाढलेलं निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन पुढच्या महिन्यापासून त्यांच्या अकाऊंटवर क्रेडिट करणार