पश्चिम महाराष्ट्रातील पुरामुळे मुंबईत दुधाचा तुटवडा, 13 लाख लिटर दुधाची आवक घटली
एबीपी माझा वेब टीम | 08 Aug 2019 07:40 AM (IST)
पुणे, नाशिक तसेच कर्नाटक , गुजरात इत्यादी विभागातून काही प्रमाणात दूध आले असले तरी तो पुरवठा अतिशय कमी असणार आहे. कोल्हापूर, सांगली इथली पूरपरिस्थिती ओसरली नाही तर हा तुटवडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई : पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पूरपरिस्थितीचा परिणाम मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि उपनगरांच्या दूध पुरवठ्यावर झाला आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्याला आज आणि पुढील दोन ते तीन दिवस दुधाच्या तुटवड्याला सामोरे जावे लागणार आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा इत्यादी विभागातून येणारे सुमारे 13 लाख लिटर दूध आज मुंबईत पोहोचले नाही. गोकुळसारख्या सात लाख लीटर दूध वितरित करणाऱ्या कंपनीमध्ये आज दूधच न आल्याने आज नवी मुंबईतील डेअरी बंद आहे. आज पुणे, नाशिक तसेच कर्नाटक , गुजरात इत्यादी विभागातून काही प्रमाणात दूध आले असले तरी तो पुरवठा अतिशय कमी असणार आहे. कोल्हापूर, सांगली इथली पूरपरिस्थिती ओसरली नाही तर हा तुटवडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. सांगली, कोल्हापुरात आलेल्या महापुरामुळे मुंबईत दुधाची आवक घटली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पुरेसं दुध मिळणार की नाही?, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महापुरामुळे सांगली आणि कोल्हापुरात दूध संकलन बंद करण्यात आलं आहे. शिवाय उपलब्ध असलेलं दूध मुंबईत पोहोचण्याची शक्यता नाही. कारण मुंबईकडे येणाऱ्या पुणे बंगळुरु महामार्गावर पाणी आल्यानं काही दुधाचे ट्रक अडकून पडले आहेत. जवळपास 13 लाख लिटर दुधाची आवक घटली आहे. आजही दुधाचे टँकर मुंबईत येणार नसल्यानं पुढील किमान तीन दिवस तरी दुधाचा तुटवडा भासणार आहे. दरम्यान चितळे कंपनीकडून पुणे, सांगली आणि नवी मुंबईला नियमित दूध पुरवठा सुरु राहणार आहे. गोकुळचे साडेपाच लाख लिटर दूध टँकरमध्ये अडकले गोकुळचे साडेपाच लाख लिटर दूध टँकरमध्ये अडकले आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रमुख मार्ग बंद आहेत. यामुळे गोकुळ दूध संघाचे दुधाचे टँकर भरून जागेवरच थांबले. किमान दहा लाख लिटर दुध शिल्लक असल्याची माहिती संघाने दिली आहे. याचा फटका गोकुळच्या आर्थिक व्यवहारावर बसणार आहे.