मुंबई : लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याआधीच भाजप आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं दिसत आहे. फडणवीस सरकार लवकरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या विचारात आहे.


आगामी विधानसभा निवडणुकीआधी फडणवीस सरकार हे मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. थकबाकीदार शेतकरी आणि थकबाकीची माहिती जिल्ह्या-जिल्ह्यातून मागवण्यात आली आहे.  मार्च 2016-17 ते 2018 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी करुन त्यांना मोठा दिलासा देण्याचे सरकारचे प्रयत्न असणार आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यभरात विकास यात्रा काढून जनतेशी संवादही साधणार आहेत. राज्य सरकारने आतापर्यंत राज्यातील 43 लाख 35 हजार शेतकऱ्यांना 18 हजार 235 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली आहे.

VIDEO | सरकार आल्यास 10 दिवसात राहुल गांधीकडून कर्जमाफी | मुंबई 



संघटन मंत्र्यांची काल माझ्यासोबत बैठक झाली, आज कार्यकारिणीची बैठक होत आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. दुष्काळासंदर्भातील मदत सर्व लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी कार्यकर्त्यांना आदेश दिले गेले आहेत. दोन वर्षांपासून जशी लोकसभेची तयारी सुरु केली त्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केल्याचंही ते म्हणाले.

पाच वर्षात सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, असं यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. पात्रधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी सुरुच राहील, असंही रावसाहेब दानवेंनी सांगितलं.

विविध वाहिन्या आणि संस्थांच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होण्याची शक्यता बहुतांश एक्झिट पोलमध्ये दिसत आहे.