मुंबई : राज्यातील दुष्काळसदृश गावांमध्ये अखेर दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील 33 जिल्ह्यातील 29 हजार 600 गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.


 

33 जिल्ह्यातील 29 हजार 600 गावांमध्ये दुष्काळ जाहीर

 

ज्या भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. नागरिकांचं स्थलांतर सुरु आहे, अशा ठिकाणी तात्काळ दुष्काळ जाहीर करा,असे आदेश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिले आहेत. त्यानंतर काल रात्री राज्य सरकारनं तातडीनं राज्यातील 33 जिल्ह्यातील 29 हजार 600 गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला.

 

दृष्काळसदृश नव्हे, दुष्काळ!

 

2015-16 मधील खरीप हंगामातील अंतिम आणेवारीत ज्या गावांमध्ये 50 पैशापेक्षा कमी आहे, त्या गावांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. आधी या गावांना दुष्काळसदृश म्हणून घोषित केलं होतं, विविध योजना आखल्या होत्या. आता ‘दुष्काळसदृश’ ऐवजी ‘दुष्कळ’ वाचावा, अशी अधिसूचनाही सरकारने जारी केली आहे.

 

तसंच दुष्काळासाठी स्वतंत्र निधी कोशाची तरतूद करण्याचीही सूचना कोर्टानं केली आहे. दुष्काळाबाबत सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या याचिकेवर हा निर्णय देण्यात आला. केंद्र आणि राज्यानं त्वरीत दुष्काळाचे निकष ठरवून पावलं उचलावीत, अशी अपेक्षाही यावेळी कोर्टानं व्यक्त केली.