मुंबई : महाराष्ट्र शासनाने कोविडच्या चाचण्यांबाबात नवी नियमावली जाहिर केली आहे. केंद्र शासनाच्या सूचनांवर आधारीत हे नियम आहेत. ज्यांच्या चाचण्या करायच्या आहेत त्यांची तीन गटात विभागणी करायची आहे. ज्यांना तातडीने उपचाराची गरज आहे त्यांच्या ॲंटीजन चाचण्या करायच्या आहेत. सध्या सरसकट ॲंटीजन चाचण्या केल्या जात आहेत. संशयीत मृत्यू, प्रत्येक गरोदर माता, ॲापरेशन आधी कोविड चाचणी करायची आहे.


कोवीड-19 साथीचे रुग्ण राज्यातील सर्वच जिल्हयांमध्ये आढळून आले आहेत. या रुग्णांच्या संख्येमध्ये सतत वाढ होत आहे. कोवीड -19 चाचण्यांसाठी आयसीएमआर ने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या सूचना तसेच राज्यातील रुग्णांचे स्वरुप लक्षात घेऊन राज्याच्या कोवीड-19 चाचण्यांचे अॅलगोरिदम तयार करण्यात आले आहेत.


अॅलगोरिदमनुसार चाचण्या करण्यासाठी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना


1. अॅलगोरिदममध्ये कोवीड-19 चाचण्या करण्यासाठी व्यक्तीची विभागणी तीन गटामध्ये करण्यात आली आहे. प्रत्येक गटासाठीचा चाचणीचा प्रकर अंतर्गत नमुद केला आहे. त्यानुसार ज्या व्यक्तींना उपचारासाठी त्वरीत चाचणी करणे आवश्यक आहे अशांसाठी अॅंटीजन चाचणी करण्यात यावी. यामुळे अशा रुग्णांच्या उपचाराबाबत अध्या तासांत निर्णय घेता येणे शक्य होईल.


2. RTPCR चाचणी ही ज्यांची अॅंटीजन चाचणी नकारात्मक आली आहे परंतु त्यांना लक्षणे आहेत किंवा पॉझिटिव्ह व्यक्तींचे हाय रिस्क कॉन्टॅक्ट किंवा परदेशांतून भारतात येणा-या व्यक्ती यांची करण्यात यावी.


3. ब्रॉट डेड व्यक्ती, बाळतंपणासाठी आलेल्या माता, ज्या रुग्णांची शस्त्रक्रिया करायची आहे अशा व्यक्तींची ट्रु नॅट (True nat) चाचणी करण्यात यावी. ज्या ठिकाणी ट्रु नॅट (True nat) सुविधा उपलब्ध नाही अशा ठिकाणी या व्यक्तींची अॅंटीजन चाचणी करण्यात यावी.


4. मनोरुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना प्रथम एक आठवडा क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात यावे. त्यानंतर त्यांची अॅंटीजन चाचणी करावी आणि त्यानुसार विलगीकरण कक्ष किंवा रुग्णालयातील संबंधीत वॉर्डमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात यावा.


5. तुरुंगाबाबत सुध्दा कैदी दाखल झाल्यानंतर एक आठवडा क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात यावे. त्यानंतर कैद्याची अॅंटीजन चाचणी करावी. चाचणीच्या निष्कर्षानुसार विलगीकरण कक्ष किंवा रुग्णालयातील संबंधीत वॉर्डमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात यावा.


6. ब-याच जिल्हयांमध्ये एकाच रुग्णांच्या 2-3 चाचण्या होतात. यामुळे चाचण्यांवरील ताण वाढतो आणि शासनाचा आर्थिक भार सुध्दा वाढतो. त्यामुळे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार प्रत्येक व्यक्तींची चाचणी करावी, अधिकच्या चाचण्या करु नयेत.


7. प्रवास करणा-या व्यक्ती, जिल्हयात दाखल होणा-या व्यक्ती, व्यापारी अशांची त्यांना कोवीड-19 सदृश्य लक्षणे नसल्यास कोवीड-19 चाचणी करण्यात येऊ नये.