धुळे : लाखो एसटी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसारच वेतन घेऊ, अन्यथा माघार नाही, असं दिवाळीच्या कालावधीत चार दिवसाच्या संप कालावधीत ठणकावून सांगणाऱ्या एसटीच्या मान्यता प्राप्त संघटनेच्या कारभाराविषयी सध्या एसटी कर्मचाऱ्यांमध्ये साशंकता उपस्थित होत आहे. त्याला कारणही तसंच आहे.


एसटी कर्मचाऱ्यांना चांगलं वेतन मिळावं, ही एसटी प्रशासनाची भूमिका आहे. यासाठी प्रयत्न देखील सुरू आहेत. वेतन करार हा याचाच एक भाग, यासाठी एसटी कामगार संघटना या मान्यता प्राप्त असलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सवडीनुसार तारीख आणि वेळ ठरवण्यात आली.

मात्र कामगारांच्या हितापेक्षा या संघटनेच्या नेत्यांना स्वहित जोपासायचंय का, अशी चर्चा आता एसटी कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे. एसटी प्रशासन चर्चेला तयार असताना मान्यता प्राप्त संघटनेने वेळ काढू धोरण अवलंबत 20 मार्च 2018 या दिवसाची वेळ एसटी प्रशासनाकडून मागितली.

ही संघटना कामगार संघटना आहे की ‘काममार संघटना’ अशी देखील चर्चा एसटी कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या स्वरात सुरु आहे. एकूणच एसटीच्या या मान्यता प्राप्त संघटनेच्या वेळ काढू धोरणामुळे कामगारांचे प्रश्न सुटण्यास विलंब होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोषाचं वातावरण आहे.

संबंधित बातम्या :

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, अखेर लालपरी रस्त्यावर


एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसाठी उच्चाधिकार समिती स्थापन