मुंबई : बेस्टच सेवेत असलेल्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार दररोजच्या दररोज भोजनभत्ता देण्यात यावा असे निर्देश परिवहन मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिले आहे. गेली दोन महिने एक हजार बसेससाठी सुमारे 4 हजार 500 पेक्षा अधिक एसटी कर्मचारी मुंबईतील बेस्ट वाहतूकीच्या सेवेत आहेत. त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था एका खाजगी संस्थेला देण्यात आली होती.


कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ व संबंधित कंपनीकडून जेवण पुरवण्याची वेळ यामध्ये तफावत असल्याने जेवणाबाबतच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. त्याबाबत अनेक तक्रारी कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांच्याकडे केल्या होत्या याची गंभीर दखल घेऊन सदर खाजगी कंपनीचे जेवणाचे कंत्राट तातडीने रद्द करुन सर्व कर्मचाऱ्यांना दरोरोज रोखीने भोजनभत्ता देण्यात यावा, असे निर्देश मंत्री अनिल परब यांनी दिले आहे.


अनिल परब यांनी दिलेल्या निर्देशानुसार कर्मचारी राहत असलेल्या निवासव्यवस्थेची रोजच्या रोज पाहणी करण्यासाठी मध्यवर्ती व क्षेत्रिय कार्यालयाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली 7 पथके तयार करण्यात आली असून, त्याच्याद्वारे कर्मचाऱ्यांना पुरववण्यात येणाऱ्या निवासव्यवस्थेबाबत अहवाल मध्यवर्ती कार्यालयास सादर करण्यात येणार आहे. त्यानुसार एस.टी. प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही करुन, संबंधित एसटी कर्मचाऱ्यांना भोजनभत्ता देण्याची व्यवस्था व चांगल्या दर्जाचे निवासव्यवस्था करण्यात येत आहे.