Pune Kumar Sangakkara :  श्रीलंकेचा (Sri Lanka) क्रिकेट समालोचक कुमारा संगकारा (Kumar Sangkkara) याच्यावर पुण्यातील (Pune) रुबी हॉल क्लिनिकमध्ये यशस्वी उपचार करण्यात आले. भारत-श्रीलंका सामन्याच्या एक दिवस आधी 4 जानेवारीला अंग थरथर कापत असल्याने त्याला तातडीने उपचारासाठी हिंजवडीतील रुबी हॉल क्लिनिकमध्ये हलवण्यात आलं होतं. डिहायड्रेशन आणि तापावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला सामन्यापूर्वी डिस्चार्ज देण्यात आला.


त्याच्यावर उपचार करणारे रुबी हॉल क्लिनिकचे फिजिशियन आणि इंटेन्सिव्हिस्ट डॉ. श्रीधर देशमुख म्हणाले की, घरीच डॉक्टरांना बोलावण्यात आले होते. त्यांना थंडी वाजून येणे, डोकेदुखी, आतड्यांमध्ये दाह आणि ताप आला असल्याचे सांगण्यात आलं होतं. यामध्ये ते डिहायड्रेट झाल्याचं आढळून आले होते आणि 103 डिग्री सेल्सिअस ताप होता. आम्ही त्यांना रुग्णालयात दाखल करुन घेतले आणि त्यांना पुन्हा हायड्रेट केले आणि इतर उपचार दिले आणि ते डिहायड्रेशनपासून लवकर बरे झाले."


संगकाराकडून रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांचे आभार


"रुग्णालयातील अनेकांनी माझी चांगली काळजी घेतली. त्यामुळे या रुबी हॉल क्लिनिकच्या सर्व टीमचे मी आभार मानतो. त्यांनी माझी केलेली माझी सेवा आणि घेतलेली काळजी घरच्यांप्रमाणे होती. माझ्या आरोग्यात होणाऱ्या प्रत्येक बदलांवर त्यांनी काटेकोरपणे नजर होती. त्यांच्या या वागणुकीमुळे मला देखील आधार वाटला. शिवाय सुरक्षितही वाटलं. मी रुबी हॉल क्लिनिकमधील सर्वांच्या अविस्मरणीय आठवणी घेऊन जात आहे आणि माझी प्रकृती पूर्ववत सुधारल्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे," असं म्हणत संगकाराने डॉक्टरांचे आभार मानले. 


'खेळाडूंनी काळजी घ्यावी'


"प्रत्येक खेळाडूंनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. सध्या वातावरणात बदल होत आहेत. याचा परिणाम प्रत्येकाच्या शरीरावर होत आहे. त्यात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे योग्यवेळी पाणी पिण्यापासून तर जेवणापर्यंत त्यांनी आपल्या डाएटवर लक्ष दिलं पाहिजे," असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. 


भारतीय खेळाडूंसाठी सुवर्णसंधी


भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची चांगली संधी असल्याची जाणीव करुन देण्याची गरज असल्याचे श्रीलंकेचा महान खेळाडू कुमार संगकाराने सांगितलं. तंदुरुस्त आहेत याची खात्री करण्यासाठी खेळाडूंनी पुरेसे वन-डे क्रिकेट खेळले पाहिजे. त्यांना या वर्षी वन डे सामने कसे खेळायचे हे त्यांना माहिती आहे आणि ते उत्तम खेळतात. ते एक संघ म्हणून एकजुटीने खेळतात. त्यामुळे यंदा भारतीय खेळाडूंसाठी ही सुवर्णसंधी असल्याचं त्याने सांगितलं आहे.