गोंदिया : 500 रुपये दिले नाहीत म्हणून 45 वर्षीय मुलाने 70 वर्षीय वडिलांची काठीने वार करुन निर्घृण हत्या केली. गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चुलोद गावात ही खळबळजनक घटना घडली.


वडिलांनी शेतातील झाड आपल्याला न विचारता 500 रुपयांना विकल्याच्या रागातून रेवतीलाल मैश्राम यांनी वडिलांची हत्या केली. वडील डोमुनू मेश्राम हे दुपारी झोपेत असताना रेवतीलालने त्यांच्यावर लाकडी काठीने वार केले. या बेदम मारहाणीत डोमुनू यांचां मृत्यू झाला.

कुटुंबीयांनी ही घटना दडपण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी पोलिसांत तक्रारही देण्यात आली नाही. मात्र, गावातील इतर लोकांना या घटनेची माहिती पडल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी रेवतीलाल या आरोपीला अटक केली असून, त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने आरोपीला 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.