सोलापूर : पुण्याहून कमी पॉझिटिव्हिटी रेट असताना देखील सोलापूरकरांना निर्बंधामध्ये कोणतीही शिथिलता देण्यात आलेली नाही. त्यामुळे सोलापूर शहरातील अनेक पदाधिकारी व्यापारी यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचेकडे निवेदन देऊन लॉकडाऊन शिथिल करण्यात यावे अशी मागणी केली होती. त्यानंतर निर्बंधामध्ये शिथिलता द्यावी यासाठी पाठपुरावा करीत असून येत्या दोन दिवसांत सोलापूर शहराला स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून मान्यता देऊन येत्या दोन दिवसांत पुण्याप्रमाणेच शिथिलता देणार असल्याचे पालकमंत्री  दत्तात्रय मामा भरणे यांनी सांगितले आहे.  राष्ट्रवादीचे सोलापूर शहर कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्यामार्फत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती कळवली आहे.


संतोष पवार यांनी सांगितले की, पालकमंत्री भरणे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी संपर्क करून सकारात्मक प्रतिसाद मिळवला आहे. आजच निर्णय होणे अपेक्षित होता परंतु मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर असल्याने प्रस्तावावर सही होऊ शकेली नाही. परंतु  यासाठी पाठपुरावा करीत असून येत्या दोन दिवसांत सोलापूर शहराला स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून मान्यता देऊन पुण्याप्रमाणेच शिथिलता देणार आहे. 


सोलापूर शहरात जून आणि जुलै महिन्यात कोरोना नियंत्रणात आहे. व्यापारी व दुकानदार कोरोना नियमांचे पालन करीत आहेत. सायंकाळी 4 नंतर शहरातील दुकाने बंद असतात. सोलापूर शहराचा जुलै महिन्यातील पॉझिटिव्हीटी रेट एक टक्क्यांपेक्षा खाली आहे. ऑक्सिजन बेडची टक्केवारी सहा टक्के आहे. त्यामुळे सोलापूर शहरातील व्यापारपेठ सुरू करण्याची आवश्यकता आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जिल्हाचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी सोलापूर महापालिकेला स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून मान्यता दिली होती. त्यामुळे जून महिन्यात बाजारपेठ सुरू झाली होती. आता मात्र स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून मान्यता दिलेली नाही. त्यामुळे सोलापूर शहरातील अनेक पदाधिकारी व्यापारी यांनी पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे निवेदन देऊन लॉकडाऊन शिथिल करण्यात यावे अशी मागणी केली होती. 


पुण्यात आज पासून दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र राज्यशासनातर्फे अद्याप कोणतीही परवानगी न मिळाल्याने सोलापूर शहरात निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. सोलापूर शहरात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट हा 1.3 टक्के इतका आहे. त्यामुळे शहरातील निर्बंध शिथिल करण्यात यावेत अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली होती. मात्र काल पालिका आयुक्तांनी आदेश जारी करत आधी प्रमाणेच निर्बंध लागू राहतील अशा सूचना दिल्या आहेत.