मराठवाड्यात वीज कोसळून सहा जणांचा बळी, गारपीटीचाही फटका
एबीपी माझा वेब टीम | 16 Mar 2017 08:03 AM (IST)
बीड : मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. ऐन रब्बीच्या मोसमात गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. तर वीज कोसळून मराठवाड्यात सहा जणांचा बळी गेला आहे. ज्वारी, गहू, हरभऱ्यासह आंबा आणि द्राक्षाचे प्रचंड नुकसान झाले. लातूर, बीड, नांदेड, परभणी आणि उस्मानाबादमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, तर सोलापूर जिल्ह्यातही गारपीट झाली. वीज पडून बीड जिल्ह्यात पाच जणांचा तर सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यात एकाचा मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्याला सायंकाळी पावसामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेले. पावसाचा सर्वाधिक तडाखा दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि मंगळवेढा तालुक्यांना बसला. गहू, हरभरा, ज्वारी, द्राक्ष यासारख्या पिकांना मोठा फटका बसला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील द्राक्षबागा भुईसपाट झाल्या.