सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग-कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर 2227 फूट उंच असलेल्या रांगणा गडावर सिंधुदुर्गातील कुडाळ निवजे गावातील 80 वर्षाच्या आजी खड्या चढाईने दोन तासात चढाई केली. लक्ष्मी विष्णू पालव असं या आजींचं नाव असून त्या कुठेही न थांबता चालत गडावर चढल्या.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवडत्या किल्ल्यामध्ये रांगणा या गडाचा समावेश होतो. कोल्हापूर जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्याने संपन्न असा हा रांगणा गडावर शिव मंदिर, रांगणाई देवी, हनुमान मंदिर, तलाव, गणेश मंदिर आजीबाईनी पाहिलं. गडावर जाऊन ऊर्जा मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रांगणा गडावर न थकता आजी एका जोमात चालत गेल्या. रांगणा गड शिलाहार राजा भोज दुसरा यांनी बांधला आहे.


निवजे गावातील 80 वर्षाच्या आजी लक्ष्मी पालव यांनी आपल्या कुटुंबासह रांगणागड पायी चालत दोन तासात गड सर केला. सायंकाळी आजीबाई त्याच जोमाने गडावरुन पुन्हा खाली उतरल्या. या वयातही मोठ्या जिद्दीने त्यांनी केलेला हा प्रवास थक्क करणारा आहे.


पालव कुटुंबाने आपल्या कुटुंबात असणाऱ्या तीन पिढ्यातील सदस्यांसोबत रांगणागडावर जायचा बेत आखला. त्यांच्या नियोजनात कुटुंबातील सर्वांनी मिळून गडावर एक दिवसाची सहल काढण्याचे निश्चित केलं. नातवंड आणि पतवंडानी आपल्या आजीला सोबत गडावर येण्याचा आग्रह धरला. आजीनेही याला होकार दिला. आजी आपल्या सोबत येणार म्हणून नातवंडे, पतवंडे यांचा आनंद द्विगुणित झाला. आपल्या तीन पिढ्यांच्या कुटुंबासमवेत शिवाजी महाराजांच्या जयघोषात लक्ष्मी आजींनी गडावर चढायला सुरुवात केली. आजींनी न थकता दोन तासात हा गड सर केला.


80 वर्षाच्या आजींची ही रांगणागडाची सफर सर्वांनाच अचंबित करणारी आहे. या आजी आजही शेतात काम करतात. त्या निरोगी आहेत. त्यांचा हा प्रवास तरुणाईला लाजवणारा असाच आहे.


महत्वाच्या बातम्या: