हिंगोली :   दिवाळीच्या काळात मामाच्या गावी जाणाऱ्या भावा बहिणीचा एका अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने हिंगोली जिल्ह्यात दुःख व्यक्त केले जात आहे.  विरेगाव येथील रहिवासी असलेल्या अरविंद सूर्य यांची दोन मुले कीर्ती सूर्य आणि आदर्श सूर्य मामा राजू खिलारे यांच्यासोबत गावी जात होती. 


मामाच्या गावी जात असताना वसमत ते निळा या मार्गावरील रोडवर टाकळगाव जवळ अचानक समोरून टाटा मॅजिक पिकप क्रमांक MH 22 AA 1620 ला जोरदार धडक दिली आणि या धडकेत आदर्श सूर्य (9)आणि कीर्ती सूर्य (8) या दोघांचा या धडकेमध्ये जागीच मृत्यू झाला आहे. तर मामा राजू खिलारे (24) यांना गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना 4 नोव्हेंबरला सायंकाळच्या सुमारास घडली आहे.



या घटनेची माहिती मिळताच तत्काळ ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टाटा मॅजिक पिकप चालकाला ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी वसमत उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले तर मामा राजू खिलारे यांच्यावर उपचार सुरू आहेत.


या घटनेमुळे जिल्ह्याभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  उद्याच भाऊबीज असताना आज या दोन भावंडांचा अपघातात मृत्यू झाल्याने प्रचंड दुःख व्यक्त केले जात आहे.  मामा राजू खिलारे हा त्याच्या भाचा आणि भाचीला त्याच्या गावी म्हणजेच महिपाल पिंपरी या गावी घेऊन जाण्यासाठी आला होता. परंतु वाटेतच काळाने घाला घातला. 



या घटनेची माहिती मिळताच राजू खिलारे यांचे गाव महिपाल पिंपरी आणि कीर्ती व आदर्श यांचे गाव विरेगाव या गावामध्ये शोककळा पसरली आहे.  आता या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.