मुंबई: 'ज्यांना मुंबईतले खड्डे बुजवता आले नाही ते विदर्भाचा विकास काय करतील', असा घणघाती सवाल  करीत माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. श्रीहरी अणे 'माझा विशेष' कार्यक्रमात बोलत होते. याचवेळी स्वतंत्र विदर्भाची आग्रही मागणी करीत त्यांनी सेनेवर बोचरी टीका केली.


 

श्रीहरी अणेंनी शिवसेनेवर निशाणा साधत वेगळ्या विदर्भाची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे आता शिवसेना या टीकेला कसं उत्तरं देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

तर दुसरीकडे अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावरुन आज दुसऱ्या दिवशीही विधीमंडळात गदारोळ बघायला मिळाला. अखंड महाराष्ट्र ठेवणं हे शिवसेनेचं कर्तव्य आहे. त्याबद्दल काँग्रेस राष्ट्रवादीनं शिकवू नये अशा शब्दात शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीचा अखंड महाराष्ट्राबद्दलचा प्रस्ताव फेटाळून लावला.

 

दरम्यान, अखंड महाराष्ट्रासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं अशासकीय प्रस्ताव मांडण्याची तयारी केली आहे. ज्याला शिवसेनेनं कडाडून विरोध करण्यात आला आहे. अखंड महाराष्ट्रासाठी शिवसेना शेवटपर्यंत लढत राहील. मात्र, आम्ही अशासकीय प्रस्तावाला पाठिंबा देणार नाही, असं सेना नेत्यांनी स्पष्ट केलं आहे.

 

संबंधित बातम्या:

 

काँग्रेस-राष्ट्रवादीने अखंड महाराष्ट्र शिकवू नये : शिवसेना

 

मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री : फडणवीस