बीड : बीडमधील  होळ गावजवळ झालेल्या शिवशाही बसच्या अपघातात एका शिक्षिकेचा मृत्यू झाल्याचं नुकतंच समोर आलं आहे.


अपघातातील जखमींना अंबाजोगाईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी  उपचार घेत असताना रेणुका कल्याण माळी या 30 वर्षीय शिक्षिकेचा मृत्यू झाला. कंबरेला जबर मार लागल्याने तिच्यावर तात्काळ उपचारही सुरु करण्यात आले होते. मात्र, काही वेळापूर्वीच तिचे अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात निधन झालं.

लातूरहून औरंगाबादकडे निघालेल्या राज्य परिवहन मंडळाच्या शिवशाही बसला (बस क्रमांक ०९ ईएम २४६८) होळजवळ समोरुन येणारे वाहन चुकविताना अपघात झाला होता. यावेळी संपूर्ण बसच पलटी झाल्याने प्रवाशांना मार लागला होता. यात सहा प्रवासी जखमी झाले होते.

या सर्व प्रवाशांना उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेत असतानाच माळी चिंचोली येथील रेणुका कल्याण माळी (३०) या शिक्षिकेचा मृत्यू झाला. बसचा चालक भागवत दादाराव केंद्रे आणि लातूर येथील प्रवाशी अमर जियाद्दीन सिद्दीकी हे गंभीर जखमी झाले आहेत.