शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याचा राजीनामा नाही : अनिल देसाई
एबीपी माझा वेब टीम | 28 Sep 2016 08:33 AM (IST)
मुंबई : 'सामना'तील व्यंगचित्रावरुन शिवसेनेमध्ये राजीनामा सत्र सुरु झाल्याच्या बातम्या निराधार असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. या वृत्तामध्ये काहीही तथ्य नसल्याचं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार अनिल देसाई यांनी म्हटलं आहे. बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार शशिकांत खेडेकर, संजय रायमुलकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपले राजीनामे सुपूर्द केले होते. व्यंगचित्र प्रकरणावरुन जनतेचा रोष उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचावा, यासाठी तिघांनी आपले राजीनामे पाठवल्याचं सांगितलं आहे. मात्र आता शिवसेनेच्या नेत्यांनीच उद्धव ठाकरेंकडे कोणाचेही राजीनामे आले नसल्याचं स्पष्ट केलं आहे. व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाईंकडून दिलगिरी शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'तील वादग्रस्त कार्टूनप्रकरणी व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. कोणत्याही समाजाचा भावना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असतील ती मी दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दात श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी 'सामना'तून व्यंगचित्र वादावर स्पष्टीकरण दिलं आहे. माफी मागण्याचा प्रश्नच नाही : शिवसेना दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी व्यंगचित्राचा वाद राजकीय फायद्यासाठी पेटवत आहे. त्यामुळे याप्रकरणी उद्धव ठाकरेंनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. वादग्रस्त व्यंगचित्र आणि दगडफेक मराठा मोर्चावरुन 'सामना'मध्ये रविवारी वादग्रस्त कार्टून छापलं होतं. याच्या निषेधार्थ नवी मुंबईतील वाशी इथल्या ‘सामना’च्या कार्यालयावर अज्ञातांनी दगडफेक केली. तर ठाण्यातील कार्यालयावर शाईफेक करण्यात आली. इतकंच नाही वादग्रस्त कार्टूनमुळे ठिकठिकाणी 'सामना' पेपर जाळून निषेध नोंदवला जात आहे. संभाजी ब्रिगेडने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली दरम्यान, संभाजी ब्रिगेडने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ‘सामना’ने मराठा समाजाची आणि महिलांची बदनामी केली आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. संंबंधित बातम्या