उस्मानाबाद : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे लातूर, उस्मानाबादच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत. दुष्काळग्रस्त भागातील लोकांशी संवाद साधताना शिवसेना तुमच्या सोबत असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.


मला शेतीतील काही कळत नाही. मी शहरी बाबू आहे, मात्र शेतकऱ्यांचं दुःख शिवसेनेला कळतं. त्यासाठी मी दुष्काळी पाहणी करण्यासाठी आलो आहे. निवडणुका येतील जातील मात्र सर्वसामान्य शेतकरी पाणीटंचाई, चाराटंचाईने त्रस्त असताना शिवसेना त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे, असं आदित्य ठाकरेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितलं.


यावेळी आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना पशुखाद्य, पिण्याच्या पाण्यासाठी टाक्या यांचं वाटप केलं. राज्यात दुष्काळामुळे सर्वत्र पाण्याची मोठी समस्या आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी आत्महत्येचा विचार मनात आणू नये. तुम्ही शिवसेनेला आवाज द्या, आम्ही हजर राहू, असा विश्वास आदित्य ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिला.


आदित्य ठाकरेंनी लातूर जिल्ह्यातील बुधोडा, लामजाना, किल्लारी आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील नारंगवाडी, सालेगाव, जेवळी, येनेगूर या गावांना भेटी दिल्या. शेतकऱ्यांना मदत करताना तो कोणत्या पक्षाचा आहे, हे आम्ही पाहणार नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी नको तर सरसकट कर्जमुक्ती द्यावी. यासाठी प्रत्येक गावातील शेतकऱ्यांच्या याद्या आम्ही गोळा करत आहोत. लवकरच यासाठी योग्य ती भूमिका घेण्यात येईल, असंही आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं.