नवी दिल्ली : शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्या अशी मागणी लोकसभेत केली आहे. गावित म्हणाले, 'अध्यक्ष महोदय आम्ही ही मागणी करतो की बिरसा मुंडा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या दोघांनाही भारतरत्न पुरस्कार देऊन पुरस्काराचा गौरव वाढवावा'.


स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी कोणत्याही शिफारशीची गरज नाही असं केंद्र सरकारने एका प्रश्नाच्या उत्तर देताना 19 नोव्हेंबरला म्हटलं होतं. भाजपाच्या जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासंबंधी आश्वासन देण्यात आलं होतं. केंद्र सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. महायुती तुटल्यानंतर पहिल्यांदाचा शिवसेना विरोधी बाकावर बसली आहे. महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेच्या पेचानंतर हा निर्णय महायुतीकडून घेण्यात आला. आता शिवसेनेने स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बिरसा मुंडा यांना भारतरत्न दिलं जावं अशी मागणी केली आहे.

अधिवेशनात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यासंदर्भात शिफारस करण्यात आली आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारने हा महत्त्वाचा खुलासा केला आहे. केंद्राकडे भाररत्न पुरस्कार देण्यासाठी शिफारसी केल्या जातात. मात्र भारतरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्याची आवश्यकता नाही. शिफारशी शिवाय देखील हा पुरस्कार दिला जातो. भारतरत्न देण्यासंदर्भात योग्यवेळी निर्णय घेण्यात येईल, असं केंद्रीय गृहमंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

कोण आहेत राजेंद्र गावित?
राजेंद्र गावित 2009 च्या पालघर विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस मधून विजयी झाले. त्यांनतर त्यांना काँग्रेसकडून आदिवासी विकास राज्यमंत्री पद देण्यात आले. 2014 मध्ये गावित यांचा शिवसेनेच्या कृष्णा घोडा यांचा पराभव केला होता. शिवसेनेचे आमदार कृष्णा घोडा यांच्या अकाली निधनाने पुन्हा 2016 मध्ये पालघर विधानसभेची पोट निवडणूक झाली.  पुन्हा दिवंगत कृष्णा घोडा यांचे चिरंजीव अमित घोडा यांनी काँग्रेसच्या गावित यांचा पराभव केला.  त्यानंतर 2018 मध्ये पालघरचे भाजप खासदार चिंतामण वनगा यांचे निधन झाले त्यांनतर लागलेल्या लोकसभा पोट निवडणुकीत राजेंद्र गावित यांनी भाजपाची वाट धरली आणि ते शिवसेनेच्या श्रीनिवास वणगा यांचा पराभव करत लोकसभेत निवडून आले. त्यानंतर 2019 साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप आणि सेनेच्या संगनमताने गावित शिवसेनेत गेले आणि पालघर लोकसभेचे शिवसेनेचे खासदार म्हणून दुसऱ्यादा निवडून आले