Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षासंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात (Supreme Court) महत्त्वाचा दिवस असणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षासंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टात उद्या पहिल्या क्रमांकावरच महाराष्ट्राचे (Maharashtra Political Crisis) प्रकरण असणार आहे. तब्बल एक ते सव्वा महिन्याच्यानंतर उद्या या प्रकरणावर सुनावणी होत आहे.  न्यायमुर्ती धनंजय चंद्रचूड (Dhananjaya Y. Chandrachud) यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ महाराष्ट्राच्या प्रकरणाची सुनावणी करणार आहे.  


सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर उद्यापासून पुन्हा या प्रकरणातील मूळ मुद्द्यांवर युक्तिवाद होणार आहे. शिवसेनेचे चिन्ह गोठवण्याबाबत निवडणूक आयोगाने जी कारवाई केली त्याचाही उल्लेख उद्याच्या सुनावणीत होण्याची शक्यता आहे. घटनापीठाचे कामकाज सलग होणार की नाही याबद्दल देखील स्पष्टता येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महराष्ट्राच्या सत्ता संघर्षासंदर्भात उद्याची सुनावणी महत्वाची असणार आहे. या प्रकरणावर न्यायालय काय निर्णय देणार याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.  






पाच न्यायाधीशांच्या खंडपीठामध्ये कुणाचा समावेश आहे? 


1. न्या. धनंजय चंद्रचूड
2. न्या.एम आर शहा
3. न्या. कृष्ण मुरारी
4. न्या.हिमाकोहली
5. न्या. पी नरसिंहा


या पूर्वी 27 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी झाली होती. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये न्यायालयाच्या कामकाजामध्ये अनेक सुट्ट्या आहेत. नवरात्रीची नऊ दिवसांची सुट्टी आणि त्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज पुढे जाणार हे स्पष्ट होतं. त्यामुळे पुढील सुनावणीसाठी 1 नोव्हेंबरची तारीख देण्यात आली होती. 


राज्यातील सत्तासंघर्षाचा प्रश्न हा 21 आणि 22 जून रोजी सुरु झाला होता. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं. आतापर्यंत तीन बेंचकडे हे प्रकरण गेलं. सुरुवातीला व्हेकेशन बेंचसमोर याची सुनावणी झाली. त्यानंतर तत्कालीन सरन्यायाधीश एन व्ही रमणा (N. V. Ramana) यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या बेंचकडे यावर सुनावणी सुरू झाली. त्यानंतर यावर पाच न्यायाधीशांचे एक घटनापीठ तयार करण्यात आलं.